आमदार राहुल कुल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : दौंड तालुक्यातील वास्तवतेची दखल
पारगाव – महाराष्ट्रातील तरूणांना बेघर करणाऱ्या ऑनलाइन रमीवर बंदी आणावी, अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. दैनिक प्रभातने याबाबत दौंड तालुक्यातील ऑनलाइन रमीवर सडेतोड वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत आमदार कुल यांनी ही मागणी केली आहे.
ऑनलाइन रमीमुळे दौंड तालुक्यातील अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. यात तरुणांचा लक्षणीय सहभाग आहे. यात लाखो रुपयांची कमाई या ऑनलाइन जुगारात घालविली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबप्रमुखांना आपली वाडवडिलार्जित जमिनी विकाव्या लागल्या आहेत. सोलापूर महामार्गालगतची सधन गावे आणि औद्योगिक टापूतील गावांतील तरुणांचा सहभाग आहे.
मोबाइलवर सहज टाइमपास म्हणून खेळला जाणारा खेळ आयुष्याचा सारीपाट बिघडविणारा ठरला आहे. आपल्या पाल्याच्या कारनाम्याने अनेक पालकांनी 5 लाखांपासून ते 25 लाखांपर्यंतची देणी फेडली आहेत. यात घर, जमीन, शेती विकावी लागली आहे. दैनिक प्रभातने “ऑनलाइन रमीमुळे अनेक कुटुंब बेघर’ हे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची गांभीर्याने दखल घेऊन आमदार कुल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे.
ऑनलाइन रमी खेळावर त्वरित बंदी आणण्याची मागणी कुल यांनी केली आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, अनेक तरुण यात फसले आहेत. सहज पैसे कमवायचे आमिष दाखवून लोकांच्या घामाची कमाई लुटली जात आहे. घरबसल्या खेळला जाणार हा जुगार.
अनेकांना बेघर करणारा आहे. केरळ राज्यात रमी खेळापायी सर्वस्व गमावलेल्या अनेकांनी आत्महत्या केल्याने केरळ सरकारने या रमीवर बंदी आणली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यात बंदी आणण्याची मागणी आमदार कुल यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
संपूर्ण जिल्हा रमीच्या विळख्यात
भौतिक सुविधांच्या मागे धावणारी तरूणाई ऑनलाइन रमीच्या विळख्यात सापडली आहे. झटपट, विनाकष्टाने पैसा कमविण्याची चटक अनेक तरूणांना लागली आहे. यात मोबाइलवर ऍप डाऊनलोड करून हा खेळ मांडला जात आहे. एकमेव दौंड तालुक्यातील प्रकार हा जिल्ह्यात हिमनगाचे टोक असल्याची चर्चा सुरू आहे. बारामती, इंदापूर, खेड, आंबेगाव, पुरंदर, हवेली तालुक्यातील तरूणाई यात गुरफुटली आहे. त्यामुळे ऑनलाइन रमीची किड संपूर्ण जिल्ह्याला व्यापून टाकली आहे. याचे दूरगामी परिणाम गावगाड्यातील कुटुंबांवर पडत आहेत. तसेच अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. तसेच काही कुटुंबांची वाताहात झाली आहे. त्यामुळे ऑनलाइन रमीवर बंदी आणावी, अशी मागणी होत आहे.