मुंबई – राज्यातील मंत्र्यांची नुकतीच एक बैठक झाली होती. या बैठकीला सर्वच मंत्री उपस्थित होते. यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू असतानाच ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्यूंचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला. तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे? असा सवाल त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच विचारला.
ही घटना गंभीर आहे. काळजी घेतली पाहिजे, असेही अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले. यावर एकनाथ शिंदे यांनी त्यांना उत्तर दिले. मात्र, यामुळे वादाची ठिणगी उडू शकते, हे दिसताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर हा विषय थांबल्याचे सांगण्यात येत आहे.
अजित पवार यांनी थेट राज्याचे प्रमुख असलेल्या आपल्या नेत्यालाच भरबैठकीत सवाल केल्याने शिंदे गटाचे मंत्री, आमदार चांगलेच नाराज झाल्याचे समोर येत आहे. यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडणार असल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे रोखठोक स्वभावाचे आहेत. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हा प्रश्न विचारला असेल. अजित पवारांनी जाब विचारण्याबाबत घेतलेली भूमिका योग्य आहे, असेही राऊत म्हणाले.
बैठकीतील सर्वच मंत्री अवाक्
सर्व मंत्र्यांच्या बैठकीत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच प्रश्न विचारल्यामुळे बैठकीत उपस्थित सर्वच मंत्री अवाक् झाल्याची माहिती आहे. अनेकांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. सुरूवातीला तर एकनाथ शिंदेही या प्रश्नावर आश्चर्यचकीत झाल्याचे दिसले.
मात्र, त्यांनी लगेच अजित पवारांना ठाण्याच्या रुग्णालयात झालेल्या घटनेची संपूर्ण माहिती दिली. रुग्णांचा मृत्यू कसा झाला? किती रुग्णांची प्रकृती कशी गंभीर होती, शेवटच्या क्षणी रुग्णालयात किती रुग्ण आले? रुग्णालयावर येणारा ताण आदीची माहितीही शिंदे यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे.