हिंगोली – देशात विकासाचा झंझावात आणणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भाजपामधूनच सतत डावलले जात असून आता त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वालाच आव्हान देण्याची गरज असल्याचे मत शिवसेना नेते खासदार विनायक राऊत (ठाकरे गट) यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हिंगोलीत आयोजित सभेच्या पार्श्वभुमीवर पाहणी करण्यासाठी खासदार राऊत हिंगोलीत आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते.
राऊत म्हणाले, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात विकासाचा झंझावात लावला. त्यांच्यावर कॅगचा आरोप लावण्याचे दृष्टचक्र भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने चालविल्याची शंका येते.
मागील काही वर्षापासून गडकरींचे अधिकार काढून घेऊन त्यांना हतबल करायचे त्यांना राजकारणातून आऊट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केल्या. त्यामुळे त्यांचे नेतृत्व, कर्तृत्व इंडिया आघाडीत आल्यास नक्कीच त्यांचे स्वागत केले जाईल.
गडकरी यांनाच प्राधान्य
आजही भाजपचे लोकसभेचे खासदार व नेत्यांचे गुप्तमत घेतले तर पंतप्रधानपदासाठी सर्व जण गडकरींना प्रथम प्राधान्य देतील. शिवाय ते गडकरींवर अन्याय होत असल्याचेही सांगतील. मात्र दहशत, दबंगगिरी, मुजोरीपणा यामुळे कोणी तोंड उघडत नसल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र गडकरींनी आता भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाला आव्हान देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. गडकरींना डावलल्या जात असल्याची गंभीर दखल महाराष्ट्राने घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.