हिंगोली – हिंगोली लोकसभा मतदारसंघातील जिल्हा निवडणूक कार्यालय या ना त्या कारणाने चांगलेच चर्चेत राहते. आता या कार्यालयाच्या मी मतदान करणारच या स्वाक्षरी मोहिमेला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच या फलकाकडे पाठ फिरवली. तर दुसरीकडे काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी मात्र फलकावर स्वाक्षरी करून आपली हौस फेडून घेतली.
हिंगोली लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी बैठकांचा सपाटा लावला. मात्र बहुतांश बैठका मधील सूचनांचे पालन केले जात नसल्याचे चित्र आहे. जिल्हा निवडणूक कार्यालयातील त्रिकूटाच्या एकाधिकारशाहीला इतर अधिकारी व कर्मचारी चांगलेच कंटाळून गेले आहेत.
दरम्यान हिंगोली जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी तसेच जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाने स्वाक्षरी मोहीम हाती घेतली. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर स्वाक्षरी फलक ही लावण्यात आला. मात्र या स्वाक्षरी फलकावर केवळ बोटावर मोजणे एवढ्या स्वाक्षऱ्या दिसून येत आहेत.
विशेष म्हणजे कार्यालयात दररोज 100 पेक्षा अधिक कर्मचारी येत असताना या फलकावर मात्र कमीच स्वाक्षऱ्या असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी ही या फलकाकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसू लागले आहे. याशिवाय सदरील फलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावल्यामुळे मतदानासाठी कोणामध्ये जागृती केली जात आहे असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
मागील दोन दिवसापासून मी मतदान करणारच या मतदान जागृती फलकाकडे कार्यालयात येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी देखील दुर्लक्ष केले आहे.