पेंदरा (छत्तीसगड) – पंतप्रधान घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीतील दोन कुटुंबांनी आपल्याला या योजनेत घर मिळालेच नसल्याचा दाव केला आहे. उषा लाल कोळ आणि गुड्डा रौतेल या दोन व्यक्तींनी आपल्याला या योजनेंतर्गत घर अथवा घर बांधण्यासाठी पैसे यापैकी काहीही मिळाले नसल्याचे म्हटले आहे. आश्चर्य म्हणजे या दोघांची नावे लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आहेत.
“माझे घर पंतप्रधान आवास योजनेतून बांधलेले नाही. हे घर कुठे आहे, हे कोणीही सांगत नाही आहे. प्रत्येक पवसाळ्यात गळणाऱ्या छतामुळे आम्हाला खूप त्रास होतो.’ असे उषा कोळ यांनी सांगितले. तर “माझे तर घरच नाही. कोणीतरी माझे फोटो काढले आणि घर मिळेल, असे सांगितले. पण प्रत्यक्षात काहीही झाले नाही.’असे गुड्डा रौतेल यांचे म्हणणे आहे. सध्या ते दुसऱ्याच्या रिकाम्या घरात रहात आहेत. मूळ मालकाने घर खाली करायला सांगितले, त्र कोठे जायचे असा त्यांच्यासमोरचा प्रश्न आहे.
या प्रकरणी सखोल चौकशी करून निधीचा अपहार कोणी केला, त्याचा शोध घेतला जाईल. तसेच या लाभार्थ्यांना त्यांच्या वाट्याचे योजनेचे पैसे मिळतील, याची काळजी घेतली जाईल, असे पांदरा जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. तर जिल्हाधिकाऱ्यांनीही या प्रकरणी अहवाल मागवला आहे. या दोन्ही लाभार्थ्यांना न्याय मिळेल असे आश्वासन त्यांनी दिले आहे. या प्रकरणी पोलिसांनीही तपासाला सुरुवात केली आहे.