मुंबई – देशातील सर्व सीमारेषावर आज अशांतता आहे. आपल्या सीमेवरची बहुतेक राष्ट्रे चीनची मांडलिक आहेत. त्या चीननेही आता आमच्यावर आक्रमण केले. हे चुकलेल्या परराष्ट्र आणि संरक्षणविषयक धोरणाचे फलित आहे. अमेरिकेचे ट्रम्पही उद्या निवडणूक हरतील. मोदींच्या बाजूने आता कोण उभे राहील? चीनच्या आक्रमणाने बाहुबली राजकारणाची हवा निघाली, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे खासदारसंजय राऊत यांनी केली.
पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात झालेलया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून मोदी सरकारवर हल्ला चढविला.चीनने आपले 20 सैनिक मारले. त्याचा बदला मोदी सरकार कसा घेणार, हाच खरा सवाल आहे. बदला घेण्यासाठी, सर्जिकल स्ट्राइक करुन विजयी डंका पिटण्यासाठी पाकिस्तान हा राखीव ठेवला आहे?,असा सवालही त्यांनी केला.
20 जवानांच्या हत्येचा बदला मोदी सरकारने घेतला नाही तर ती आपली सगळ्यात मोठी मानहानी ठरेल. 1962चे चीनबरोबरचे युद्ध नेहरुंच्या धोरणांमुळे हरलो, हा डंका भाजपला आता पिटता येणार नाही,असा टोला राऊत यांनी लगावला.
गलवान खोऱ्यात चीनचे सैन्य घुसले आणि आज गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या कब्जात आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने बुधवारी दुपारी अधिकृतपणे जाहीर केले की, गलवान खोरे हा चीनचाच भूभाग आहे. मोदी सरकारने तटस्थतेचे धोरण सोडून अमेरिकेच्या जास्त कच्छपी लागण्याचे धोरण स्वीकारले. सीमेवरचा चीन जास्त आक्रमक झाला हे येथे लक्षात घेतले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.
तर महासत्ता काय करणार?
भारताच्या सीमेवरील बहुतेक सर्व राष्ट्रे आज चीनची मांडलिक झाली आहेत. पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका ही राष्ट्रे चीनच्या मदतीवर जगत आहेत. चीनच्या इशाऱ्यावर देत भारताला आव्हान देवू पाहात आहेत. महासत्ता अमेरिकेशी मैत्री वगैरे ठीक, पण सीमा अशांत राहिल्या तर महासत्ता काय करणार? अमेरिकेसाठी निकटचा शेजारी असलेल्या चीनशी भांडण करणे ही परराष्ट्र आणि संरक्षणविषयक नीती असू शकत नाही, असे देखील संजय राऊत म्हणाले.