वडूज -करोनामुळे सर्वच क्षेत्रात आर्थिक मंदी असून शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेंतर्गत फळबाग लागवड करून आपली आर्थिक स्थिती सुधारण्याची आवश्यकता आहे. होतकरू शेतकऱ्यांना शासन निश्चितच सहकार्य करेल, असे आश्वासन सहकार, पणन व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.
पंचायत समिती व तालुका कृषी विभागाच्यावतीने होळीचागाव, ता. खटाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर फळबाग लागवडीच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी महेश झेंडे, माजी सभापती शिवाजी सर्वगौड, संदीप मांडवे, तहसीलदार अर्चना पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी मेडेवार, तालुका कृषी अधिकारी अरुण जाधव, मंडल कृषी अधिकारी दिलीप दाभाडे, कृषी सहाय्यक एन. एस. पवार, भाऊसाहेब लादे, सरपंच अविनाश शिंदे उपस्थित होते. महेंद्र देशमुख व प्रशांत शिंदे यांच्या शेतावर आंबा फळबाग लागवडीचा आणि बांधावर बियाणे, खते, गांडूळ खत युनिट वाटपाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.