शिक्रापूर प्रतिनिधी: देशभरात कोरोनाचे संकट उभे राहिलेले असताना प्रत्येक गावातील ग्रामपंचायत कर्मचारी हे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष प्रयत्न करत असून गावामध्ये स्वच्छता राखत, वेळोवेळी औषध फवारणी करत आहेत, याबाबत शिक्रापूर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा धान्य वाटप करून सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान केला असल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी भारावून गेले आहे.
शिक्रापूर ता. शिरूर येथील ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य सध्या गायब झालेले असताना देखील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत, गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीसती विशेष प्रयत्न करत असल्यामुळे येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याचा निर्णय सामाजिक कार्यकर्ते बाबा चव्हाण व पत्रकार शेरखान शेख यांनी घेतला आणि त्यांनतर सामाजिक कार्यकर्ते बाबा चव्हाण, पत्रकार शेरखान शेख, पोलीस नाईक अनिल जगताप, उद्योजक संतोष मांढरे, भानुदास हरगुडे, अजित गायकवाड, विशाल सांडभोर, पतंजली योग समितीचे अंकुश घारे, प्रवीण शिवरकर, रियाज शेख, बाबा भुजबळ यांनी एकत्र येत शिक्रापूर ग्रामपंचायतच्या अठरा कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देत सन्मान करून त्यांना धान्य व किराणा भेट दिला आहे, याप्रसंगी शिक्रापूर ग्रामपंचायतचे क्लार्क गणेश भुजबळ, गणेश गायकवाड, सुभाष भुजबळ, विलास पवार, राहुल राजगुरू, तुळजा माने, बबलू शेख, प्रसाद वाडेकर, बाळू चव्हाण यांसह आदी ग्रामपंचायत कर्मचारी तसेच तलाठी अविनाश जाधव, अशोक भुजबळ, उबेद मुलानी आदी उपस्थित होते, तर यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आमच्या कार्याची दखल घेत आमचा गौरव केला असल्याची बाब आमच्यासाठी आनंदाची असल्याचे मत अनेक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.
ग्रामपंचायत सदस्य गेले कोठे ?
देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेले असताना अनेक गावांमधीन नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला असताना काहींवर उपासमारीची वेळ आलेली आहे, शिक्रापूर येथे देखील अशीच परिस्थिती असून गावामध्ये सतरा ग्रामपंचायत सदस्य असून नागरिकांना जेवण, धान्य देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, संघटना तसेच परिसरातील काही कंपन्या पुढे येत आहे, मात्र गावातील ग्रामपंचायत सदस्य व इतर पुढारी गायब आहेत, चक्क ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडे देखील त्यांचे लक्ष नाही त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य गेले कोठे ? असे म्हणण्याची वेळ नागरिक व ग्रामस्थांवर आली आहे.