खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नाला यश
कराड (प्रतिनिधी) – करोना लॉकडाऊनमुळे कतारमध्ये अडकलेले पाटण तालुक्यातील 32 नागरिक मायदेशी परतले. मुंबई विमानतळावर ते शनिवारी पहाटे पोहचले. त्यांच्या घरवापसीसाठी साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी विशेष प्रयत्न केले असून त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.
पाटण तालुक्यातील नोकरीनिमित्त कतार येथे गेलेले 32 नागरिक तेथेच अडकून पडले होते. करोनामुळे जगभरात लॉकडाऊन परिस्थिती असल्याने ते कतारमध्ये अडकले होते. अडकलेल्या नागरिकांनी भारतात परतण्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांना संपर्क साधून विनंती केली होती. त्यानुसार खासदार पाटील यांनी परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांना तात्काळ पत्र लिहून याबद्दल कळवून त्या नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी विनंती केली होती. खासदार पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून कतारमध्ये अडकलेले ते नागरिक शनिवारी पहाटे मुंबई येथील विमानतळावर पोहचले.त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आल्यानंतर त्याचे सातारा जिल्ह्यात आगमन झाले. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
कतारमध्ये अडकलेले पाटणचे 32 जण आपल्या घरी परतले आहेत. त्या सगळ्यांचे मी मनापासून स्वागत करतो. खासदार सुप्रियाताई सुळे यांनीही याकामी सहकार्य केले. त्यामुळे या लोकांची तिथून येण्याची उत्तम व्यवस्था झाली आहे. ते सर्व घरी पोहोचण्याचा आनंद मनस्वी आनंद आहे.
खासदार श्रीनिवास पाटील, सातारा