नवी दिल्ली : देशव्यापी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर स्थलांतरीत मजुरांचे लोंढे घराची वाट चालू लागली आहेत. मात्र हे लोंढे आहेत तेथेच थोपवावेत, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारांना केले आहे.
राज्य सरकार आणि केंद्र शासीत प्रदेशांना गृहमंत्रालयाच्या वतीने एक मार्गर्शक सूचना जारी करण्यात आली. त्यात हॉटेल आणि वर्कींग वुमन हॉस्टेल सारख्या संस्थांना आवश्यक तो जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होईल, याची काळजी घ्या म्हणजे तेथे राहणारे तेथेच राहतील, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी स्थलांतरीत शेतमजूर, औद्योगिक कामगार आणि असंघटीत क्षेत्रातील कामगार यांचे मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर रोखावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सरकारमार्फत या घटकांसाठी राबवल्या जाणाऱ्या उपाय योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत या घटकांना मिळणारे मोफत अन्न धान्य याची माहिती द्या. ते त्यांच्यापर्यंत पोहोचवा. त्यसाठी या विभागाचा कारभार सुरळीत राहील, याची काळजी घ्या. त्यामुळे होणारे हे स्थलांतर रोखता येऊ शकेल, असे गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.