ब्युनोस आयर्स – अखेपर्यंत रंगतदार ठरलेल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या अर्जेंटिनाकडून भारताला 3-2 असा निसटता पराभव पत्करावा लागला.
अर्जेंटिनाच्या मिकाएला रेटेग्यूने 25 व्या मिनिटाला संघाचे खाते उघडले. त्यानंतर भारताच्या शर्मिलाने 34 व्या तर, गुरजित कौरने 40 व्या मिनिटाला गोल करत आघाडी मिळवून दिली. मात्र, ऑगस्टिना गॉझेलीनीने 50 व्या व ग्रॅनॅट्टो मारियाने 57 व्या मिनिटांना गोल करत अर्जेंटिनाचा विजय साकार केला.
अर्जेंटिनाला सहाव्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाल्याने आघाडी घेण्याची संधी चालून आली; परंतु भारतीय गोलरक्षक सविताने हा प्रयत्न हाणून पाडला. दुसऱ्या हाफमध्ये अर्जेंटिनाला 21 व्या आणि 23 व्या मिनिटालाही लाभलेले पेनल्टी कॉर्नर वाया गेले, पण 25 व्या मिनिटाला मिकाएने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्यात यश मिळवले.
34 व्या मिनिटाला नवज्योत कौरने नवोदित शर्मिलाच्या साहाय्याने भारताला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. मग 40 व्या मिनिटाला ड्रॅगफ्लिकर गुरजितने भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन्ही संघांना मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये करण्यात अपयश आले, पण 50 व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या ऑगस्टिनाने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून सामन्याचे चित्र पालटले.
त्यानंतर सामना संपायला तीन मिनिटे बाकी असताना ग्रॅनॅट्टोचा गोल निर्णायक ठरला. पराभवानंतरही या मालिकेत भारताच्या हॉकीपटूंनी केलेल्या अफलातून खेळामुळे टोकियोत होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतही भारतीय खेळाडू सरस कामगिरी करतील असा विश्वास मिळाला आहे.