जयपूर – राजस्थानातील टोंक जिल्ह्यातून हिंदूंना निर्वासित केले जात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. तेथे वारंवार धार्मिक स्वरूपाचा तणाव निर्माण करून हिंदूंपुढे तेथे राहण्यास अवघड स्थिती तयार केली जात आहे, असाही आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे.
प्रदेश भाजप अध्यक्ष सतीश पुनिया यांनी हा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्या जिल्ह्याच्या मालपुरा भागातील हिंदू रहिवाशांनी त्यांना कशा प्रकारचा त्रास तेथे दिला जात आहे त्याची पोस्टर्स आपल्या घराबाहेर लावली आहेत. या भागात मोठ्या प्रमाणावर जातीय दंगली गेल्या काही काळात घडवल्या गेल्या आहेत. त्यामुळे सुमारे तीनशे हिंदू कुटुंबे तेथून परागंदा झाली आहेत.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी याची दखल घेऊन त्या भागातील हिंदूंना न्याय दिला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. मालपुरा भागात हिंदूंसाठी सुरक्षित वातावरण तयार करणे हे राज्य सरकारचे काम आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, तेथील शांततेचा भंग केल्याच्या कारणावरून पोलिसांनी काही जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.