धुळे – मागील शनिवारी, समृद्धी महामार्गावर झालेला अपघात आणि त्यानंतर मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर गावाजवळ झालेला अपघात यांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. महामार्गांवर होणाऱ्या अपघातांची दिवसेंदिवस संख्या वाढत आहे. धुळे जिल्ह्यातील दोन राष्ट्रीय महामार्गांवर गेल्या चार वर्षांत 887 अपघात झाले आहेत. 278 लोकांनी आपला जीव गमवावा लागला आहे.
राज्यातील राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचे सापळे बनत चालले आहेत, असा सूर आता सर्वत्र उमटायला सुरुवात झाली आहे. याला कारण आहे वाढती अपघातांची संख्या. ही संख्या आता जनतेच्या चिंतेची बाब बनत आहे.
धुळे जिल्ह्यातून मुंबई – आग्रा आणि नागपूर – सूरत हे दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. या दोन महामार्गांवरून रात्रंदिवस वाहनांची वर्दळ सुरू असते, शहरांसह जिल्ह्यात वाढणारी वाहनांची संख्या, महामार्गावरून वाहन चालविताना होणारे नियमांचे उल्लंघन ही वारंवार अपघात होण्यामागील प्रमुख कारणे आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही महामार्गांवर वाढणारे अपघात रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
18 अपघात प्रवन क्षेत्रे
धुळे जिल्ह्यातील दोन्ही राष्ट्रीय महामार्गाच्या ठिकाणी 18 ठिकाणे अशी आहेत की, तिथे सातत्याने अपघात होतात. मात्र या ब्लॅक स्पॉट समजला जाणाऱ्या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. सूरत नागपूर महामार्गाचे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले काम अजूनही संथ गतीने सुरू आहे. यामुळे एकीकडे नागरिकांचा प्रवास सुसाट व्हावा यासाठी राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती होत असली तरी दुसरीकडे मात्र होणाऱ्या अपघातांची संख्या अफाट असल्याने, ते रोखण्यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.