लोणी देवकर (वार्ताहर) – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वरकुटे बुद्रुक (ता. इंदापूर) येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. बांधकाम मजुरांच्या दृष्टिकोनातून कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे बांधकाम मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नव्याने निर्माण होत असलेल्या उड्डाणपुलाच्या ठिकाणी यापूर्वी देखील अनेक लहान मोठे अपघात होऊन काहींनी यामध्ये प्राण गमावले आहेत. कायद्यानुसार मजुरांच्या जीवितांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करणे बंधनकारक आहे; मात्र संबंधित ठेकेदार तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण शासनाच्या कामगार कल्याण विभाग या कायद्याला पायदळी तुडवत मजुरांच्या खेळ चालला आहे.
संबंधित मजूर हे परप्रांतीय असल्याने त्यांच्याकडून याबाबत कोणताही आवाज उठविला जात नाही. कामाच्या ठिकाणी या उड्डाण पुलाच्या कामाच्या ठिकाणी साधारणतः 25 ते 30 कामगार काम करीत असतात; मात्र हे काम करीत असताना मजुरांच्या सुरक्षेतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र दिसत आहे.
संबंधित मजुरांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, हातमोजे, सेफ्टी शू,ज पुलाच्या बाजूला जाळ्या अशा कोणत्याच उपाययोजना केलेल्या दिसून येत नाही. पुलाच्या खांबाचे काम करताना कामगार असुरक्षितपणे फळीवर किंवा लोखंडी गजावर उभे राहून आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यामुळे एखादा अपघात होऊन त्यांच्या जीविका धोका निर्माण होऊ शकतो.
अपघात टाळण्यासाठी की होण्यासाठी पूल
या ठिकाणी वारंवार लहान-मोठे अपघात होऊन अनेकांनी जीव गमावले. त्यावर उपाययोजना म्हणून या ठिकाणी उड्डाणपुलाचे मागील सहा महिन्यांपासून काम सुरू आहे; मात्र त्या ठिकाणी कसलेही सूचना किंवा दिशादर्शक फलक नसल्याने आणि ठिकठिकाणी गतिरोधक बसविल्याने दररोज अपघात घडत असतात.