पुणे – उन्हाचा चटका अंगाची लाहीलाही करीत आहे, शहरात सलग दुसऱ्या दिवशी हंगामातील उच्चांकी 41 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, त्यामुळे दिवसभर रस्त्यावर वर्दळ कमी होती. दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत सलग दोन-तीन दिवसांपासून रस्ते ओस पडत आहेत. दुपारच्या वेळेत लक्ष्मी रस्ता, मंडई, तुळशीबाग येथील उलाढालही मंदावली आहे. रात्री 8 वाजेपर्यंत तीव्र उकाडा जाणवत असल्याने त्यानंतर पुणेकर खरेदीसाठी बाहेर पडत असल्याने मुख्य बाजारपेठा रात्री उशीरापर्यंत सुरू ठेवल्या जात आहेत.
शहरातून अवकाळी पाऊस गेला आणि अवघ्या चार दिवसात पुणे शहरात कमाल तापमानाने नवा उच्चांक गाठला आहे. असह्य करणारा उन्हाचा चटका बसताच, अंगाची काहीली होत आहे. सकाळी 10 वाजल्यापासूनच चटका देणारे ऊन वाढते. दुपारी 12 नंतर चटका आणखी वाढल्यामुळे रस्त्यावरून गरम झळाबाहेर येत असल्यामुळे दुचाकीस्वार अक्षरश: उकडून निघत आहेत. याच कारणातून दुपारी शहरासह, उपनगरातील रस्तेही ओस पडत आहेत. कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिकही क्षणभर मिळेल त्याठिकाणी सावलीचा आसरा घेत असल्याचे दिसतात.
दुकाने बंदची परंपरा कायम…
पुणे शहरात दुपारच्यावेळी बंद दुकाने बंद ठेवण्याची “परंपरा’ आहे. काही दुकानदारांनी ती मोडीत काढली असली तरी वाढत्या उष्णतेमुळे सध्या शहरातील सर्वच ठिकाणच्या बाजारेठांतील दुकाने दुपारीच बंद ठेवली जात आहेत. सकाळी 10 वाजता दुकाने उघडल्यानंतर सध्या तरी ग्राहक येत नाहीत याशिवाय दुपारी कडक उन्हामुळे खरेदीसाठी कोणीही बाहेर पडत नाही त्यामुळे काही दुकाने सायंकाळी 4 पर्यंत थेट बंद तर काही दुकाने अर्धे शटर बंद करून सुरू ठेवली जात आहे. परंतु, एकूण बाजारपेठेत कडक उन्हामुळे दुकाने बंदची पुण्याची परंपरा कायम राखली जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
कोरेगाव पार्क, वडगावशेरी येथे उष्णतेची लाट?
हवामान विभागाकडून कमाल व किमान तापमानाच्या मोजमापासाठी शहराच्या विविध भागात केंद्र उभारण्यात आले आहे. त्यानुसार पुणे शहरात 41 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. केंद्रनिहाय तापमान पाहता कोरेगाव पार्कमध्ये सर्वाधिक 44.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असून ही उष्णतेची लाट म्हणायचे का? तसेच हडपसर 42, मगरपट्टा 41.7, वडगावशेरीमध्ये 43.1, पाषाण 41.1, चिंचवड 42.5, तळेगाव ढमढेरे 43.8, शिरूर आणि राजगुरूनगर येथे प्रत्येकी 42.9, दौंड 41.5, पुरंदर 41.2, आंबेगाव 41.1 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेची लाट
राज्यातील कमाल तापमानात झपाट्याने वाढत असून आज पुन्हा जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 44.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. या वाढत्या तापमानामुळे पुढील दोन दिवसात कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. बंगालच्या उपसागरावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे आज “मोखा’ या चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. या चक्रीवादळाचा हवामानावर कोणताही परिणाम होणार नसून, हवामान कोरडे राहिल. मात्र, कमाल तापमानात आणखीन वाढ होवून राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भपेक्ष मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा चांगला तापला असून, बहुतांश जिल्ह्यातील कमाल तापमान 40 शीच्या पुढे गेले आहे. महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी 19.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.