नवी दिल्ली : मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांनी एका मासिकाच्या अनावरण सोहळ्याला नुकतीच हजेरी लावली होती. या कार्यक्रमा दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या मथुरेबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी मोदी एकटेच सर्वांना भारी, आता कोणाचीही पाळी येणार नाही, असे वक्तव्य केले आहे.
यावेळी हेमा मालिनी यांनी,”एक अकेला मोदी है सब पे भारी, अब नहीं आएगी किसी की बारी. विरोधक नेहमीच मोदींवर विनाकारण निशाणा साधत आले आहेत. दुसरीकडे मोदी नेहमीच देशहिताचा आणि जनतेच्या हिताचा विचार करतात”, अशी स्तुतीसुमने त्यांनी वेळी केली. तसेच हेमा मालिनी यांनी मथुरेत वेगाने होत असलेल्या विकासकामांची तपशीलवार माहितीदेखील दिली.
हेमा मालिनी पुढे म्हणाल्या,”आधी मला स्वतःला खात्री नव्हती की मी खासदार म्हणून काय करेल, पण नंतर कामाचा अंदाज येऊ लागल्यानंतर मी मथुरेत खूप बदल घडवून आणले आहेत. मी खासदार होण्याआधी मथुराची स्थिती अतिशय वाईट होती. पण आता या शहराला नवसंजीवनी दिली आणि अनेक सांस्कृतिक केंद्रे उघडली आणि मथुराचा सर्वतोपरी विकास केला”.
बॉलिवूड इंडस्ट्रीच्या ‘ड्रीम गर्ल’आणि भाजपच्या लोकसभा खासदार हेमा मालिनी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मालिनी बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्री आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी अमुल्य योगदान दिले आहे. बॉलिवूडमध्ये हेमा मालिनी यांची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. रुपेरी पडद्यासोबतच त्या राजकारणी म्हणूनही खूप सक्रिय आहेत.