नवी दिल्ली – जनधन योजना सर्वसमावेशक विकासासाठी तयार करण्यात आली होती. ही योजना प्रचंड यशस्वी झाली असून 6 वर्षांत 40 कोटी 35 लाख गरिबांचे बॅंकांत खाते उघडले गेले आहे.
योजनेच्या अंमलबजावणीबाबत समाधान व्यक्त करून अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, लोकाभिमुख आर्थिक धोरण निर्माण करण्याच्या उद्देशातून ही योजना सुरू करण्यात आली होती. जनधन खात्यामुळे गरिबांना सरकारी योजनांचा थेट लाभ झाला. या काळात गरिबांना सरकारला मदत करता आली. शेतकऱ्यांना द्यायची मदत त्यांच्या खात्यात जमा करता आली. त्याचबरोबर रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना वाढीव वेतन जनधन खात्यामधून देता आले.
किती खातेदार :
एकूण जनधन खाती किती – 40 कोटी 35 लाख
या खात्यात किती रक्कम आहे – 1.31 लाख कोटी रुपये
प्रति खाते रक्कम किती आहे – 3,239 रुपये
गरिबांना विमा योजना या खात्यामुळे सुरू करता आला. प्रत्येक कुटुंबातील एका समजदार नागरिकाचे बॅंकेत खाते असावे यासाठी योजना सुरू करण्यात आली होती. हे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यामुळे केवळ गरिबांना सरकारी योजनांचा थेट लाभ मिळत नाही तर खाते उघडल्यामुळे गरिबांची खर्च होणारी रक्कम बॅंकेत जमा होण्यास मदत होत आहे.