नवी दिल्ली : सध्या देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन शिथील करण्यात आला असून अनेक उद्योगधंद्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारकडून 20 लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे देश ठप्प झाला आहे. मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे बंद झाले आहेत. यात सरकारकडून काही प्रमाणात उद्योगांना चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
देशभरातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे राज्यातील अनेक उद्योगधंद्यांना खिळ बसली आहे. याबाबत सतत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला पत्र पाठवले आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशात अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले आहे.
गेल्या काही दिवसांत शरद पवारांनी मोदींना लिहिलेले हे तिसरे पत्र आहे. या पत्राद्वारे साखर उद्योगाला विशेष पॅकेज देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली असून त्यासाठी केंद्र सरकारला सहा उपायही सुचवले आहेत.