ठिकठिकाणी साचले पाणी, अनेक भागातील वीजपुरवठा खंडित
पिंपरी – सोमवारी दिवसभर प्रचंड उकाड्यानंतर मध्यरात्रीपासून विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. मंगळवारी सकाळी ढग हटले, परंतु दुपारी पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरू झाला. त्यानंतर सायंकाळी साडे सात वाजता पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यामुळे शहरातील काही सखल भागात पाणी साचले होते, तर खबरदारीचा उपाय म्हणून काही भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता.
सोमवारी दिवसभर ऊन असल्याने सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिटची चाहूल लागली होती. रात्रीपर्यंत नागरिकांना उकाडा जाणवत होता. मंगळवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास अचानक सुसाट वारा वाहू लागला. काही वेळेतच विजांचा लखलखट आणि ढगांचा गडगडटासह पावसाचे आगमन झाले. मुसळधार पाऊस सुमारे दीड तास सुरू होता. ढगांच्या गडगडाट इतका प्रचंड होता की, गाढ झोपलेल्या नागरिकांनाही पावसाचे जोरदार आगमन झाल्याचे कळाले. पवना धरण शंभर टक्के भरले आहे. जर पावसाचा वेग कमी न झाल्यास शहरात पुन्हा पूरस्थिती निर्माण होते की काय, अशी भिती नदीकाठच्या नागरिकांचे निर्माण झाली. मात्र दीड तासांनी पाऊस थांबल्यामुळे नागरिकांची सुटकेचा निःश्वास सोडला. पावसामुळे पुन्हा हवेत गारवा निर्माण
झाला होता.
मंगळवारी दुपारी पुन्हा शहरात दमदार पावसाने हजेरी लावली. मात्र पहाटेसारखा विजांचा गडगडाट नव्हता. पावसामुळे शहरात कुठेही झाड पडल्याची किंवा इतर कोणतीही दुर्घटना घडली नसल्याचे मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांनी सांगितले.
मंगळवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे नेहमीप्रमाणे घरकुल परिसरात पाणी साचले होते. तर थेरगाव येथील गणेश मंदिर परिसरात, तसेच कासारवाडी येथील रेल्वेच्या पूलाखाली पाण्याचे तळे निर्माण झाले होते. या भागातून जाणाऱ्या वाहन चालकांना रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. काही इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी साचले होते. तर काही भागात मंगळवारी पहाटे पावसामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. तो मंगळवारी सकाळी सुरळीत करण्यात आला.
धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात आला नसल्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थान विभागाचे प्रमुख ओमप्रकाश बहिवाल यांनी सांगितले. मात्र रात्री आलेल्या मुसळधार पावसामुळे सर्तक राहण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्तांनी मध्यरात्री दिल्या होत्या, असेही बहिवाल यांनी सांगितले.