“कहीं खुशी कहीं गम’
पाणी टंचाई, चारा टंचाईचे संकट तालुक्यावर आले असताना वळवाचा पाऊस पडू लागल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. मात्र वळवाच्या पावसाचा जोर दरवर्षीपेक्षा कमीच असल्याने शेतकरी चिंतेत आहे. शासनाच्या चारा छावण्यांचा केवळ पूर्व भागातील शेतकऱ्यांना फायदा झाला आहे, तर पश्चिम भागातील शेतकरी अजूनही चारा छावणीच्या प्रतिक्षेत आहेत. मान्सून पावसाला अजूनही अवकाश असल्याने शेतकरीराजा चिंतातूर झाला आहे. मागच्या वर्षीचा दुष्काळ या पुढेही राहणार का? या चिंतेने शेतकरी ग्रासला आहे. एकंदरीत आज पूर्व भागात झालेल्या वळवाच्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये “कहीं खुशी कहीं गम’ अशी अवस्था आहे .
राजगुरूनगर – खेड तालुक्याच्या पूर्वेकडील भागात आज वळवाच्या पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. खेड तालुक्याच्या पूर्व भागात वाफगाव, गुळाणी, दावडी, निमगाव, शेलपिंपळगाव, काळूस, आळंदी परिसरात परवा आणि आज वळवाचा जोरदार पाऊस पडल्याने या परिसरातील बळीराजा काहीसा सुखावला आहे. पेरणीपूर्व मशागतीच्या कामासाठी या पावसाचा उपयोग होणार आहे. दि. 7 रोजी मृग नक्षत्राच्या सुरुवातीला वळवाच्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या घरांचे जनाबरांच्या गोठ्याचे मोठे नुकसान झाले होते.
परवा जात वादळ आणि कमी पाऊस तर आज जास्त पाऊस कमी वादळ या परिसरात नागरिकांना अनुभवायला मिळाले. आज झालेल्या जोरदार पावसामुळे या परिसरातील ओढे नाले वाहू लागले शेतात पाणी साठले. वादळी वळवाच्या पावसामुळे भाजीपाल्याच्या पिकाला फटका बसला असला तरी बळीराजा या पावसाने सुखावला आहे. खेडच्या पश्चिम भागात मात्र पावसाचा थेंब पडत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्याच्या नजरा आकाशाकडे भिरभिरत आहेत. गेली अनेक वर्षांपासून खेडच्या पश्चिम भागात मृगाच्या अगोदर भात पिकाच्या धूळ वाफेवरील पेरण्या होतात. यावेळी मात्र मान्सून लांबल्याने भात पिकाच्या पेरण्या रखडल्या आहेत. आदिवासी भागातील शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.