बळीराजा सुखावला : आता मान्सून पावसाची प्रतीक्षा; अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले
वृक्ष उन्मळून पडल्याने काहीकाळ वाहतूककोंडी
बारामती तालुक्यात धो-धो बरसला
बारामती – बारामती शहर व तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. रविवारी (दि. 9) सायंकाळच्या सुमारास जवळपास एक तास धो धो पाऊस पडला. या पावसामुळे खरीप हंगामाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा सुखावला आहे. मान्सूनपूर्व पाऊस दमदार झाल्याने खरीप हंगामाचा मार्ग मोकळा झाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पावसाबरोबर सोसाट्याचा वारा असल्याने शहरातील काही भागात रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्ष रस्त्यावर उन्मळून पडले, त्यामुळे काही काळ वाहतूककोंडी निर्माण झाली होती.
बारामती तालुक्यात गेली सहा वर्षे पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे यंदा तरी वरुणराजाची कृपादृष्टी बारामतीवर होणार की नाही यासाठी शेतकरी चिंतातुर होते. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दमदार पावसाची प्रतिक्षा शेतकऱ्यांना होती. रविवरी सायंकाळच्या सुमारास बारामती शहर व तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मान्सूनपूर्वचा पहिलाच पाऊस दमदार झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. परंतु 65 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याशिवाय खरिपाची पेरणी करणे उचित ठरणार नाही अशा सूचना कृषी विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना खरिपाची पेरणी करण्यासाठी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दिवसभराच्या असह्य उकाड्यानंतर सायंकाळच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसाने शहरातील रस्ते पाण्याखाली गेले. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने बारामतीकरांना थंडावा मिळाला.