मंचर – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळी बाजरी काढणी आणि मळणीची कामे सुरू आहेत, परंतु रविवारी (दि. 9) वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. अनेक शेतकऱ्यांची बाजरी पावसामुळे भिजून गेली.
अवसरी, निरगुडसर, पोंदेवाडी, लाखणगाव, मेंगडेवाडी या परिसरातील काही शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरीचे पीक घेतले आहे. मार्च महिन्यात बाजरीची पेरणी करुन मे महिन्याच्या अखेर बाजरी काढणीला आली आहे. सध्या बाजरी काढणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शेतीसाठी पाण्याची टंचाई असल्याने बहुतांशी शेती मार्च महिन्यानंतर पिकांअभावी पडून होती. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी होते.
त्या शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरीचे पीक घेतले होते. बाजरी काढणी अंतिम टप्प्यात आली असून काढलेल्या बाजरीची कणसे शेतातच उन्हात तापण्यासाठी ठेवली होती. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. एक पोते बाजरी बनविण्यासाठी 200 रुपये मळणी यंत्रवाला घेत आहे. बाजरी धान्याला एक क्विंटलसाठी दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे रुपये इतका बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.