मुंबई – राज्यात अनेक भागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मुंबई, मुंबई उपनगर, कोकण आणि विदर्भात तीन ते चार दिवसांपासून पावसाचा जोर असल्याने अनेक गावांना पुराचा वेढा बसला आहे. तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात आज सकाळपासूनच ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे नदी-ओढ्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसचे शेतीचे मोठे नुकसान झाले असून काही लोक पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत.
बुलढाण जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. बुलढाण्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. संग्रामपूर आणि जळगाव तालुक्यातील लेंडी नदीला महापूर आल्याने पुराचे पाणी गावात शिरले आहे. जळगाव जामोद तालुक्यातील काथरगाव आणि दुर्गादैत्य गावाला पाण्याने वेढा घातला आहे. त्यामुळे गावात अनेक लोक अडकून पडले आहेत.
अमरावतीतही अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. सतत पाऊस सुरू असल्याने प्रमुख प्रकल्पांमधून नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील हातुर्णा गावाला पाण्याने विळखा घातला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आंबोली घाटात शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास दरड कोसळल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. तब्बल 15 तास एकेरी वाहतूक सुरू होती. 15 तासांनंतर वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत करण्यात आली आहे. अति पावसामुळे वाहतूक ठप्प झाली असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
यवतमाळमध्ये 45जण अडकले
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे सुमारे 45 लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. त्यांची सुटका करण्यासाठी आता युद्धपातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. महागाव तालुक्यातील आनंदनगर तांडा येथे पुराच्या पाण्यामुळे सुमारे 45 लोक अडकले आहेत. येथे सुमारे 231 मिमी पाऊस झाला आहे. आम्ही सातत्याने स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात असून लवकरच भारतीय हवाई दलाचे 2 हेलिकॉप्टर्स नागपुरात पोहोचतील आणि तेथून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी महागावसाठी रवाना होतील.परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे ट्विट फडणवीस यांनी केले.