खालापूर – इर्शाळवाडीतील घटना ही सर्व राजकारण्यांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. या परिस्थितीत सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील डोंगरउतारावर असलेल्या सर्व वस्त्यांचा एकत्रित विचार करायला पाहिजे. त्या-त्या ठिकाणच्या जिल्हाधिका-यांकडून माहिती घेतली पाहिजे. या योजनेची सुरुवात केल्यानंतर सरकार आणि सत्ता बदली तरीही योजनेत खंड येता कामा नये. या योजनेसाठी सरकार जो निधी देईल, त्यात कोणीही अडथळा अणू नये, अशी योजना आखली पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त नागरिकांची उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी इर्शाळवाडीतील नागरिकांना धीर देखील दिला आहे. पुनर्वसन होईपर्यंत तुमच्या पाठिशी आहोत, असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले. यावेळी विधापरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि अनिल परब देखील उपस्थित होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी अनेक आदिवासी जमाती अशा पद्धतीचे जीवन जगत आहेत. त्यामुळे आता आदिवासी जमातीला प्रवाहात आणण्याची गरज आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ज्या काही अशा पद्धतीच्या वस्त्या आहेत त्यांचे पुनर्वसन व्हायला हवे. तसेच तीन ते चार वस्त्या मिळून एखादे गाव वसवले पाहिजे, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
तसेच यंत्रणांवर ताण येऊ नये यासाठी इर्शाळवाडीत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. या लोकांसाठी पंतप्रधान आवास योजना लागू करावी आणि सरकार आले किंवा गेले तरी या योजनेला स्थगिती देऊ नये, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
मला कोणताही कमीपणा वाटत नाही
या दु:खाचं निवारण करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत, पण यासाठी तुम्हाला जी काही मदत लागेल ती करण्यासाठी आम्ही तप्तर आहोत. सध्याचे क्षेत्र हे दरड प्रवण क्षेत्रात येत असल्याने त्या संदर्भात सरकारसोबत संवाद साधणार आहे. यासाठी मी सरकारकडे जायला तयार आहे, यामध्ये मला कोणताही कमीपणा येणार नाही. मी सरकारकडे जनेतेच्या दृष्टीकोनातून पाहतो, असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.