कापूरहोळ – भोर, वेल्हे तालुक्यात सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे भोर, वेल्हे तालुक्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचे व भातपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्यामुळे भोर आणि वेल्हे तालुक्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
भोर, वेल्हे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे मुख्य पीक असलेल्या भातपिकाचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आलेली आहे. भोर व वेल्हे तालुक्यातील प्रशासनाने दखल घेऊन पिकांचे पंचनामे सुरू केलेले आहेत.
तसेच भोरचे तहसीलदार अजित पाटील व वेल्हेचे शिवाजी शिंदे म्हणाले की, कापणी केलेले भात पीक व खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभाग व महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. तलाठी,कृषी अधिकारी, ग्रामसेवक यांनी गावोगावी पंचनामे जलद गतीने करण्यास सुरुवात केली आहे.