सोलापूर – सोलापूरमध्ये पाणी पिण्यासाठी गेलेल्या तीन मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची
दुर्दैवी घटना आज घडली आहे. उत्तर सोलापूर येथील मार्डी येथे ही घटना समोर घडली.
सानिका सोनार (वय 17), पुजा सोनार (वय 13) आणि आकांक्षा वडजे (वय 11) असे बुडून मरण पावलेल्या मुलींची नावे आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चुलीसाठी लागणारे जळण गोळा करण्यासाठी तिन्ही मुली शेतात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना तहान लागली. पाणी पिण्यासाठी शेततळ्यात उतरल्या तेव्हा त्यांचा पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. तिन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक अरुण फुगे घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटेनाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.