मुंबई, दि. 5 – करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शाळांपाठोपाठ आता राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ, महाविद्यालयेही 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मात्र, विद्यापीठ, महाविद्यालयातील परीक्षा या 15 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा निर्णय सर्व अभिमत, खासगी विद्यापीठांना सुद्धा लागू होणार आहे.
राज्यातील महाविद्यालयांसंदर्भात सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, कुलगुरू यांच्यासमवेत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत कोविड 19 संसर्गाबाबत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थीं, पालक, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्यासोबत आरोग्य सुरक्षितते बद्दल सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
उदय सामंत म्हणाले, राज्यातील फक्त अकृषी विद्यापीठ नव्हे, तर इतर खासगी विद्यापीठांना सुद्धा हा निर्णय लागू राहणार आहे. सर्व विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय काल मान्य केला आहे. परीक्षांमध्ये अडचणी येत असतील तर महाविद्यालयांनी, विद्यापीठांनी हेल्पलाइन नंबर देण्याचा सूचना दिल्या आहेत.
महाविद्यालयासोबत वस्तीगृहदेखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे विद्यार्थी परदेशातून व इतर राज्यातून संशोधन करण्यासाठी आलेले आहेत त्यांच्यासाठी वस्तीगृहाची सोय सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहे.