देहुगाव – श्री संत तुकाराम महाराज आषाढी वारी 338 वा पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहुगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अतिरिक्त 52 कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. या काळात प्राथमिक आरोग्य केंद्रासह अन्य तीन ठिकाणी प्राथमिक उपचार केंद्र (बाहयरूग्ण तपासणी) असणार आहेत. पुरेसा औषध साठा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी दिली.
प्रतिनियुक्तीवर आलेल्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी-2, आरोग्य अधिकारी-11, आरोग्य सहाय्यक-6, आरोग्य सेवक-13, आरोग्य सेविका-11, पुरुष परिचारक-3, रुग्णवाहिका-5 असणार आहे. तसेच मुख्य मंदिर, वैकुंठस्थान मंदिर, गाथा मंदिर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र असे चार ठिकाणी बाह्य रुग्ण तपासणी केंद्र असणार आहेत. पुरेशा प्रमाणात औषध साठा करण्यात आला आहे.
खासगी रुग्णालयात 10 टक्के खाटा राखीव
देहू परिसरात दहा रुग्णालय असून यापैकी सात रुग्णालयामध्ये वारकरी भाविक भक्तांच्यासाठी 10 टक्के खाटा राखीव ठेवण्याबाबत लेखी पत्र देण्यात आले आहेत.
चार जलसेवा केंद्रांचा अहवाल दुषित
देहू कार्यक्षेत्रात एकूण 15 जलसेवा केंद्र आहेत. या सर्व जलसेवा केंद्राच्या पाण्याचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामध्ये 4 जलसेवा केंद्रांचा अहवाल दुषित पाणी असल्याचा प्राप्त झाला आहे. संबधित जलसेवा केंद्र चालकांनी त्वरित शुद्धिकरण करून घ्यावे अन्यथा अशा जलसेवा केंद्र सील करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
पाणी भरणा केंद्र
पालखी सोहळ्यासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा टॅंकरने करण्यात आली आहे. देहू परिसरासह पालखी मार्गावरही टॅंकर उपलब्ध असणार आहेत.
हॉटेल चालकांना सूचना
देहूमध्ये सर्व हॉटेलमध्ये यात्रा काळात स्वच्छता, शुद्धता राखणे आणि सर्व कामगारांची आरोग्य तपासणी करणे बंधनकारक आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने ही तपासणी करण्यात येणार आहे.
देहू नगरपंचायतीच्या हद्दीत गेल्या महिन्यात डेंगूचे रूग्ण आढळुन येत आहेत. त्यामुळे संभाव्य आजारांचा धोका टाळण्यासाठी डासांची पैदास होऊ नये म्हणून पाणी साचू देऊ नये.
– डॉ. किशोर यादव, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र-देहू
प्रमाणित केलेला बर्फ वापरावा
पालखी मार्गावर अनेक ठिकाणी रसवंती गृह, ज्युस सेंटर व हॉटेलमध्ये बर्फाचा वापर केला जातो. सेवाभावी संस्थांकडून लिंबू शरबत वाटप करण्यात येते. अप्रमाणित बर्फामुळे जुलाब उल्ट्याचा आजार होवू शकतात. त्यासाठी प्रत्येकाने प्रमाणित बर्फाचा वापर करावा. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पाण्याचा ओटीपी तपासावा तसेच परवानगी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नामांकित कंपनीचे पाणी ठेवा
पालखी मार्गावरील दुकानदार मिनरल पाण्याच्या बाटल्या विक्रीसाठी ठेवतात. मात्र नामांकित कंपन्यांच्याच बाटल्या विक्रीसाठी ठेवाव्यात, अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अन्यथा कारवाईचा इशारा दिला आहे.