लोणंद – श्री.संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 18 जुनला नीरा स्नान आटोपून सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. त्या पार्श्वभुमीवर साताऱ्याचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी पाडेगांव (ता.खंडाळा) येथील नीरा नदी तीरावरील श्री.दत्त घाटावरील नीरा स्नानाच्या स्थळाची रविवारी (दि.28) सकाळी साडेदहा वाजता पाहणी केली.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, वाई- खंडाळ्याचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, फलटणचे पोलीस उपअधीक्षक राहुल धस, खंडाळ्याचे प्रभारी तहसिलदार चेतन मोरे, लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, खंडाळ्याचे गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांच्यासह जलसंपदा, महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी नीरा नदीवरील ब्रिटीशकालीन जुन्या पुलाची पाहणी करून नीरा नदीवरील जुन्या पुलाचे तुटलेले संरक्षक कठडे नविन बसवून त्यात पुर्वीप्रमाणे लोखंडी सळ्या लावाव्यात. तसेच पुलाला रंगरंगोटी करा, पुलाच्या कठड्यात उगवलेले गवत काढा, तसेच पाडेगांव ग्रामपंचायतीच्या मागणीप्रमाणे पालखी मार्गावरील अपघातप्रवण क्षेत्र असलेले पाडेगांव पाटी, कॅनॉल, ऊस संशोधन केंद्र व आश्रम शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी व नीरा नदी पुलाजवळ स्ट्रेम्लर स्ट्रीप व दिशादर्शक फलक लावण्याचे निर्देश संजय कदम यांना दिले.
यावेळी पाडेगांवच्या सरपंच अनिता मर्दाने, उपसरपंच संतोष माने, विजय धायगुडे, शंकरराव मर्दाने, गजानन माने, माजी सरपंच हरिश्चंद्र माने, माजी उपसरपंच रघुनाथ धायगुडे, संतोष मर्दाने, ग्रामसेविका साधना जाधव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. लोणंद पालखी तळाची पाहणी केल्यावर जयवंशी यांनी सोहळा लोणंद मुक्कामी असताना सर्व सुविधा देण्याचे नियोजन करा, पालखी तळावर मुरुम टाकून रोलिंग करावे, तळावरील शौचालयाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशा सुचना केल्या. यावेळेस पालखी तळाला जागा कमी पडत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला.
त्यावर विकास आराखड्यात फलटणरोड नजीक 15 एकर जागा आरक्षित केली आहे. नवीन पालखी तळ विकसीत करावा लागणार असुन नवीन पालखी तळाबाबत विश्वस्तांशी बोलणे झाल्याचे प्रांताधिकारी जाधव यांनी सांगितले. दरम्यान, लोणंद शहरातून जाणाऱ्या रस्ताच्या कडेला असलेले वीजेचे खांब अडथळा ठरत असल्यावरुन वीज पुरवठा अंडरग्राऊंड करण्याची सुचना डॉ. नितीन सावंत यांनी केली.
त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित काम नगरपंचायतीने करावे, या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सुचना वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, शिवाजीराव जगताप, पोलीस उपअधीक्षक राहुल धस, एनएचएचे अधिकारी कदम, तहसीलदार चेतन मोरे, गटविकास अधिकारी अनिलकुमार वाघमारे, मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड, उपअभियंता वाय.एस. काटकर, सपोनि विशाल वायकर, सुवर्णगाथाचे अध्यक्ष डॉ नितीन सावंत, उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके, असगर इनामदार, बंटी खरात, भरत बोडरे, वीज वितरणचे सचिन काळे आदी उपस्थित होते.
पाडेगाव ग्रामपंचायतीचे पालखी अनुदान वाढवण्याची मागणी
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याचे पाडेगांव (ता.खंडाळा) येथून सातारा जिल्ह्यात आगमन होते. त्यापुर्वी माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घातले जाते. यावेळी मोठी गर्दी असते. पादुकांना नीरा नदीत सुरक्षित नेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बॅरिगेटस् उभारावे लागतात. तसेच स्वागत कक्ष, पार्किंग व्यवस्था आदी व्यवस्था मोठ्या प्रमाणावर करावी लागते. त्यासाठी शासनाकडून मिळणारे अनुदान अपुरे असून यंदा पालखी अनुदान चार लाख रूपये मंजुर करावे अशी मागणी पाडेगांवचे सदस्य रघुनाथ धायगुडे, विजय धायगुडे, हरिश्चंद्र माने यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे केली. दरम्यान, बाळूपाटलाची वाडी येथे झेब्रा कॉसिंग करावे, अशी मागणी सरपंच नवनाथ धायगुडे यांनी केली.