बऱ्याच दिवसांनी माझा एक मित्र एका कार्यक्रमात भेटला. आमच्यात म्हातारपणावरून चर्चा रंगली. तरुणाई ते आता साठी चार पावलांवरच आली आहे, येथपर्यंत चर्चेचा रोख कसा बदलला ते आम्हाला कळलेच नाही. त्याचा तावातावाने बोलण्याचा रोख असा होता की, त्याने म्हातारपणासाठी 50 लाखांच्या विम्याची कशी उत्तम सोय केली आहे वगैरे.
सुरुवातीला गमतीचे संभाषण नंतर चिंतेमध्ये बदलायला लागले. कारण म्हातारपण म्हणजे औषधं, हॉस्पिटल, विमा, पैसा यांची फक्त जमवाजमव नव्हे, केवळ पैशाची तरतूद करून म्हातारपण सुसह्य करता येत नाही तर ही नवीन आयुष्याची सुरुवात आहे, असे त्या माझ्या मित्राला मला ओरडून सांगावसं वाटत होतं.
भर तारुण्यात उमगतो । येणार म्हातारपण ।
तारुण्याचे लुसलुशीतपण ।
होईल काचऱ्यासारखे भीषण ।।
करंट्याचा धंदा । बसतो जसा ।
तशी समर्थ शरीराला येते। अवकळा ।।
वार्धक्याचे असे वर्णन फारच दुर्मिळ. वरील ओव्यांमध्ये संत ज्ञानेश्वरांचा रोख निराळ्या ठिकाणी आहे, म्हातारपणाचे दारुण दर्शन संत ज्ञानेश्वर घडवतात. त्यातून महत्त्वाचा संदेश देतात की, म्हातारपणाबद्दल तरुणाईत किंवा मध्यम वयातच विचार करून ठेवावा. कारण “वार्धक्य हे तरुणाईचे विस्तारित रूप नाही… ते एक वेगळे जग आहे. एका वेगळ्या जगाची सफर आहे”
म्हणजे बघा, भारताबाहेरील कुठल्याही देशात कायमचे जायचे तुमचे ठरले तर, तयारीसाठी यादी कराल, जसे तेथील हवामानापासून, पेहरावाच्या रितीभातीपासून, सोशल लाइफ, भाषा, नातीगोती, मित्र, आशा, आकांक्षा, अपेक्षा, तेथील सरकारचे नियम व सर्वात महत्त्वाचे म्हणजे तेथील करन्सी. म्हणजेच भारतातील व भारताबाहेरील दोन्ही आयुष्य एकमेकांपासून भिन्न, पूर्णत्वाने एक वेगळे आयुष्य जगण्याचा विचार करावा लागतो, बरोबर ना! असंच तरुणाई संपून येणारं वार्धक्य म्हणजे एक दुसरं जग आहे, नवीन आयुष्याची सुरुवात आहे.
तरुणाई आणि वार्धक्य ही दोन वेगळी आयुष्य आहेत, वेगळे जग आहे. त्या त्या आयुष्यातल्या आकांक्षा, अपेक्षा वेगळ्या आहेत. तारुण्यात कधी एकदा काम करून 2/4 तासांची झोप मिळते असे होते, तर दुसरीकडे वार्धक्यात मला बेडवरून उचलून कोणी बसते करेल का? बाहेर व्हीलचेअरवरून एखादा फेरफटका दोन-तीन दिवसांत तरी मारून आणील का? तरुणाईत फोनवर तेच तेच बोलून इतका कंटाळा येतो की फोन वाजूच नये असे वाटते, तर म्हातारपणात वाटते, नातेवाईक-मित्रमंडळी कोणी तरी एखादा तरी फोन करेल का? मी केलेला फोन उचलतील का? त्या इन्स्ट्रुमेंटकडे बघत वाट पाहावी लागते. तरुणपणात इतके गट, कार्यक्रम असतात की लोकांना भेटून तेच तेच बोलून कंटाळा यायला लागतो. तसेच माझी मुलं कधी एकदा मोठी होऊन आपापल्या पायावर उभी होऊन स्वतंत्र होतील, असे झालेले असते.
तर दुसरीकडे वार्धक्यात स्वतंत्र आपल्या पायावर उभी असलेली मुलं त्यांच्या संसारातून वेळ काढून मला भेटायला येतील का? माझ्या आवडीनिवडी लक्षात घेऊन माझ्यासाठी काही खाऊ आणतील का? तरुणाईत आयुष्य इतके वेगवान असते की सूर्योदय-सूर्यास्त कधी झाले हे कळतसुद्धा नाही. वार्धक्यात इतका वेळ असतो की दिवस-रात्र कशाचाच फरक जाणवत नाही, तासन्तास झोपच लागत नाही. अशा तऱ्हेने दोन्ही जग एकदम भिन्न आहेत. अपेक्षा, आकांक्षा वेगळ्या आहेत. पंचविशीनंतर प्रत्येक दिवस वार्धक्याकडे ढकलत जाणारा असतो. तरुणाईतच वार्धक्याची रांग सुरू होते आणि ही एकच अशी रांग आहे यात कोणी पुढे असते तर कोणी पाठीमागे, पण खरं तर या रांगेमधला पहिला नंबर कोणालाच नको असतो.
कुठल्या चलनावर तरुणाई, वार्धक्य यांचा डोलारा उभा असतो, तर तरुणाईचे चलन म्हणजे पैसा, इन्व्हेस्टमेंट, गाडी, बंगला, मोठी कामं, मी इतरांपेक्षा कसा बेस्ट, वेगळा आहे! अशी समाधानं ही तरुणाईतील चलन आहेत, तर दुसरीकडे वार्धक्य म्हातारपणातील चलन म्हणजे मला आजारपण कसे येणार नाही. मी जास्तीत जास्त लोकांमध्ये कसे चालत, फिरत राहील, अशी समाधानं मिळवणे हे वार्धक्यातील चलन आहे.
वरील चलनांचं प्रत्यक्षरीत्या आकडेवारी बघायचं झालं तर “सगळं जग म्हातारं होत आहे’ असंच दिसेल.
भारतातील आकडेवारीनुसार, 1961 साली त्यावेळेच्या लोकसंख्येच्या 5 टक्के लोक म्हातारी होती. 2001 साली हे प्रमाण 7.5 टक्के होते. 2016 साली हे प्रमाण 9 टक्के झाले, तर 2021साली हे प्रमाण 11 टक्के इतके झाले. भारताबाहेरील विकसित देशात हे प्रमाण तर अधिक आहे. चाळीस वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया जपान, चीन या देशांनी “एक मूल एक जोडपं’ पाहिजे असे ठरवले होते. कारण त्यांना जगाची अर्थव्यवस्था हातात घ्यायची होती. आता त्याच देशांमध्ये प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं असायला हवी अशी मोहीम सुरू झाली आहे.
जपानसारख्या देशात तर मूल होण्यासाठी टेस्ट ट्यूब बेबी ट्रीटमेंट जे करतील त्यांना सरकारी अनुदान आहे. हे सगळे कशामुळे तर वरील सर्व देशांमध्ये झपाट्याने म्हाताऱ्यांची संख्या वाढते आहे आणि त्या म्हाताऱ्या माणसांसाठी काम करणारी तरुण पिढीच नाही. म्हाताऱ्या माणसांना पोसण्यासाठी त्या देशांच्या अर्थव्यवस्थेचा खूप मोठा भाग खर्च होत आहे. सुपीक (productive) काम करणारी पिढी कमी होत चालली आहे. भारताचा विचार करायचा म्हटलं, तर 2000 साली 80 वर्षांच्या लोकांची जी संख्या होती ती 2050 झाली चौपट झालेली असेल. 2050 साली दर चार लोकांच्या मागे एक जण पासष्ट वर्षांचा असेल. याचाच अर्थ सुपीक (productive) लोकांची संख्या कमी झालेली असेल आणि म्हाताऱ्यांची संख्या जास्त असेल.