सेलिब्रिटी किंवा बड्या नेत्याचा मुलगा किंवा मुलीकडे संपूर्ण समाजाचे लक्ष केंद्रित असते. ते एकापरीने “स्टार कीड्स’ असतात. अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक असो किंवा अभिषेकची मुलगी आराध्या असो. याबद्दल सर्वांनाच अप्रूप वाटते. शाहरुख खानचा मुलगा आर्यन याचा उल्लेख अशाच स्टार किड्समध्ये केला जातो. यापूर्वी तो फारसा प्रसिद्धीच्या झोतात नसला तरी “पापाराझ्झी’ मंडळी नेहमीच त्याच्या मागावर असायचे. कारण शाहरुखची लोकप्रियता.
पण क्रुझ पार्टीवर छापा पडला आणि शाहरुखच्या वलयाला गालबोट लागले. अंमलीपदार्थांच्या प्रकरणात आर्यन तुरुंगात गेला आणि बॉलीवूड पुन्हा एकदा हादरून गेले. एकीकडे संपत्ती, ऐश्वर्य, दबदबा, वजन आणि दुसरीकडे तुरूंग अशा चक्रात शाहरुखचे कुटुंब अडकले आहे. अशी वेळ का आली, हा एक चिंतनाचा विषय आहे. अर्थात, ही बाब केवळ शाहरुखपुरती मर्यादित नाही. एकदा आर्यनने एका मित्राला म्हटले होते, की वडिलांना भेटण्यासाठी मला खूप वाट पाहावी लागते. एवढेच नव्हे तर त्यांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंटही घ्यावी लागते. ही गोष्ट अनौपचारिक
चर्चेतून समोर आली असली तरी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेण्यासारखे आहे. हे वास्तव आपल्याला आरसा दाखवणारे आहे. काळाचा महिमा मोठा विचित्र असतो असं म्हणतात. उत्कृष्ट अभिनय, आगळीवेगळी छाप पाडणारी संवादशैली आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व या जोरावर बॉलीवूडवरच नव्हे तर कोट्यवधी चाहत्यांवर छाप पाडणारा किंग खान शाहरुख सध्या कमालीच्या तणावाच्या आणि अडचणीच्या काळातून जात आहे. अंमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी आर्यनला आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले. दहा दिशांना ख्याती पसरलेला शाहरुख लेकाच्या निमित्ताने आयुष्यात पहिल्यांदा आर्यनला भेटण्यासाठी तुरुंगाची पायरी चढला.
प्रत्येक पालकाप्रमाणेच शाहरुखने देखील आर्यनचे बॉलीवूडमध्ये लॉचिंग करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. वडिलांप्रमाणेच देहयष्टी आणि चेहरा असणाऱ्या आर्यनलाही आयुष्यात आपल्यावर कधी तुरुंगात जाण्याची वेळ येईल, असे स्वप्नातही वाटले नसावे. आर्थर रोडच्या पायऱ्या चढताना शाहरुख प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याचे दिसत होते. पिता पुत्राची 18 मिनिटांची भेट देखील काचेच्या भिंतीतूनच झाली. दोघांचा इंटरकॉमने संवाद झाला. यावेळी शाहरुखने घरचा डबा देता येईल का, अशी विचारणा केली असता तेथील अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या परवानगीशिवाय काही करता येणार नाही, असे स्पष्ट केले.
संवादादरम्यान आर्यनने वडिलांची माफीही मागितल्याचे सांगितले जात आहे. 2 ऑक्टोबरपासून तुरुंगात असलेल्या आर्यनला जामीन मिळवून देण्यासाठी शाहरुखने केलेला आटापिटा पडद्यावर दिसत नसला तरी तो लपून राहिलेला नाही. शाहरुख हा आर्यनला भेटावयास गेला त्याच दिवशी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मालिक यांनी एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर टीका करत केंद्राच्या इशाऱ्यावर कारवाई होत असल्याचा आरोप केला. खोटेनाटे आरोप करून अडकवले जात असल्याचे नवाब मलिक म्हणाले.
यानंतर मलिकांनी वानखेडेंविरोधात आरोपांची माळच लावली. म्हणजेच आर्यनच्या अटकेवरून केवळ बॉलीवूडच नाही तर राजकीय पक्ष, केंद्र-राज्यातील सत्ताही एकमेकाविरोधात आहेत. यादरम्यान आर्यनची बालमैत्रीण अनन्या पांडेची देखील एनसीबीकडून चौकशी केली गेली. अनन्या पांडे ही चंकी पांडेची मुलगी आणि ती आर्यनची बहीण सुहानाची मैत्रीण आहे. तिच्या चौकशीमागे आर्यनशी सोशल मीडियावरचे चॅटिंग हे कारण सांगितले गेले. यात दोघेही घरात अंमलीपदार्थ असल्याची कबुली देत आहेत. म्हणून एनसीबी आता आणखी काही स्टार किड्सची चौकशी करण्याच्या तयारीत आहे.
यादरम्यान बॉलीवूडमध्ये देखील तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. स्वरा भास्करने संताप व्यक्त केला. तर कंगनाने दुसराच सूर आळवला. आणखी काही दिवस आरोप आणि प्रत्यारोप चालू राहतील. परंतु भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या शाहरुखला या संपूर्ण कालावधीत खूप नुकसान सहन करावे लागले आहे. हे नुकसान आणखी वाढू शकते, अशी शंका वर्तविली जात आहे. त्याच्या हातातून अनेक जाहिराती निसटल्या आहेत. आर्यन खानच्या करिअरवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून यापुढील पार्टीबाज स्टार किड्सची देखील झोप उडाली आहे.
आर्यन खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे, खुशी कपूर, निर्वान खान, अरहान खान यासारखे असंख्य स्टार किड्स रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्टीत बिनदिक्कत सामील होत असतात. पाण्याप्रमाणे पैसा सोडण्याबरोबरच स्टार किड्सच्या पार्ट्या या घरी किंवा एखाद्या क्लबमध्ये आयोजित केल्या जातात. अनन्या पांडेच्या घरी किंवा संजय कपूर, जान्हवी कपूर, सोहेल खान यांच्या घरी होणाऱ्या पार्ट्यांची नेहमीच चर्चा झाली आहे.
अंमली पदार्थाचे सेवन आणि त्याला प्रोत्साहन देणे हे निश्चितच निंदनीय आहे. त्याचवेळी काही प्रसिद्ध व्यक्ती देखील या प्रकरणाची दुसरी बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. लेखक प्रीतिश नंदी यांनी आर्यन प्रकरणावरून काही प्रश्न मांडले आहेत. एका प्रसिद्ध वडिलाच्या मुलाला केवळ एका व्हॉट्सऍप चॅटिंगच्या आधारावर इतके दिवस तुरूंगात ठेवणे, जामीन नाकारणे हे देशासाठी आणि घटनेसाठी योग्य नाही, असे नंदी म्हणतात. अर्थात, हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. एनसीबीच्या चौकशीचा फास आता किती आवळणार, आणखी कोणा कोणाला चौकशीसाठी बोलावणार हे आगामी काळातच कळेल.
आर्यनला आता जामीन मिळाला असला, तरी एकुणातच सध्या शाहरुखचे दिवस बरे नसल्याचे स्पष्ट होते. एका व्हॉट्सऍप मेसेजच्या आधारे एखाद्या व्यक्तीला तुरुंगात डांबणे हा वादाचा मुद्दा राहू शकतो. परंतु नशेची चटक कमी असो किंवा जास्त असो ती धोकादायकच आहे. प्रश्न असा की, एवढी मोठी संपत्ती, प्रसिद्धी ही आपल्याच घरात मुलगा आणि पालक यांच्यात संवादहीनता वाढवण्यास आणि एकटेपणाची दरी निर्माण करण्यास कारणीभूत तर ठरत नाही ना? त्यामुळे हे प्रकरण संपूर्ण समाजाला आरसा दाखवणारे आहे. आपण एवढेही मश्गुल राहू नये, की एकाच छताखाली कौटुंबिक बाग फुलवताना दलदल निर्माण होणार नाही.