गेले सुमारे दोन वर्षे भारतासह जगाच्या कानाकोपऱ्यात धुमाकूळ घालणाऱ्या करोनावर आता कुठे नियंत्रण मिळत आहे, असे वाटत असतानाच या विषाणूचा ओमिक्रोन हा नवीन प्रकार समोर आल्यामुळे पुन्हा एकदा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने विविध उपायांची योजना केली असली तरीही हे उपाय ज्या सामान्य नागरिकांसाठी आहेत त्यांनी आपली जबाबदारी विसरता कामा नये.
गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत ज्या मूलभूत कवचकुंडलांचा वापर करण्याची शिकवण आपल्या सर्वांना मिळाली आहे त्या कवचकुंडलांचा विसर पडता कामा नये. या नव्या संकटाला दूर ठेवण्याचे काम फक्त हीच कवचकुंडलं करू शकतात. दक्षिण आफ्रिकेसह जगातील काही देशांमध्ये करोनाचा ओमिक्रोन नावाचा प्रकार सापडला आहे.
त्यावर लसीकरण प्रभावी ठरणार आहे की नाही याबाबत अद्याप कोणताही निश्चित निष्कर्ष काढण्यात आला नसल्याने फक्त मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि दोन व्यक्तींमध्ये योग्य अंतर ठेवणे ही त्रिसूत्री पुन्हा एकदा या धोक्याला दूर ठेवू शकते. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने या नवीन विषाणूचा सामना करण्यासाठी सर्व प्रकारची तयारी केली असल्याने सरकारच्या या प्रयत्नांना योग्य प्रतिसाद देण्याची जबाबदारीही आता नागरिकांनी उचलायला हवी.
मागील तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत देशातील आणि राज्यांतील सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले असल्याने एक प्रकारचा निष्काळजीपणा सर्वांमध्ये आला असेल, तर हा निष्काळजीपणा झटकून टाकण्याची हीच वेळ आहे नाहीतर पुन्हा एकदा सर्व काही ठप्प होण्यास वेळ लागणार नाही. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत जो धडा आपल्याला मिळाला आहे त्यापासून बोध घेऊन आता या नवीन विषाणूला दूर ठेवण्याचे काम सर्वांनाच करावे लागणार आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये भारतात जेव्हा सर्वात प्रथम करोना विषाणूचा शिरकाव झाला तेव्हा या विषाणूला आपल्यापासून दूर कसे ठेवायचे याबाबत कोणतीच माहिती आपल्याला उपलब्ध नव्हती. पण गेल्या दीड वर्षाच्या कालावधीबाबत सर्व माहिती आणि प्रतिबंधक उपाय यांचे ज्ञान सर्वांना झाले आहे. ही माहिती तेव्हा नसल्यानेच पहिल्या काही महिन्यांमध्ये करोनाचा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसार झाला होता. त्यानंतर लसीकरण हळूहळू वाढत गेले आणि मास्क,
इतर सर्व प्रतिबंध उपायांचा वापर करण्यात आला. तेव्हा त्याच्यावर नियंत्रण बसवण्यात यश आले. त्यामुळे हे लक्षात घेऊनच आता ओमिक्रोन नावाच्या या संकटाला दूर ठेवण्याचे काम सर्वांना करावे लागणार आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने ज्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना या मूलभूत नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्या व्यतिरिक्त सार्वजनिक वाहतूक असो वा इतर कोणत्याही प्रकारची वाहतूक असो त्या ठिकाणी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे.
ज्या ठिकाणी गर्दीचे प्रमाण जास्त आहे त्या ठिकाणी फक्त लसीकरणाची कवचकुंडले उपलब्ध झालेल्या लोकांनाच प्रवेश देण्याचा नियम संपूर्णपणे अमलात आणावा लागणार आहे. जर देशात किंवा महाराष्ट्रात अद्यापही काही लोकांनी लसीकरण केलेले नाही किंवा काही लोकांचा लसीकरणाचा दुसरा डोस बाकी आहे त्या लोकांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करायला हवी.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लसीकरण या विषाणूला दूर ठेवू शकते की नाही याबाबत शास्त्रज्ञाना अद्याप शंका असल्याने हा विषाणू आपल्या आसपास फिरकणार नाही हीच प्राथमिक दक्षता घेणे सध्या महत्त्वाचे आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाल्यानंतर गर्दीचे प्रमाण वाढले आहे पण अनेकांच्या चेहऱ्यांवर मास्क दिसत नाहीत. काही लोक रुमालाचा वापर करतात. पण आता राज्य सरकारने रुमाल जर मास्क म्हणून वापर केला तर पाचशे रुपये दंडाची तरतूद केली आहे. त्यामुळे अधिकृत आणि योग्य संरक्षण करणारा असा मास्क वापरणे ही सर्वांची जबाबदारी राहणार आहे.
हा विषाणू केवळ संपर्कातून आणि संसर्गातून पसरतो ते आतापर्यंत सर्वांच्याच लक्षात आल्याने संसर्ग करणाऱ्या लोकांना भारतात प्रवेश न देणे ही सर्वात प्राधान्याची गोष्ट ठरू शकेल. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल किंवा महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सुचवल्याप्रमाणे दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या लोकांना भारतात बंदी करणे किंवा दक्षिण आफ्रिकेतून किंवा इतर युरोपीय देशातील विमानातून येणाऱ्या प्रवाशांची कठोर वैद्यकीय चाचणी करून नंतरच त्यांना भारतात प्रवेश देणे योग्य ठरेल.
गेल्या वर्षी भारतात जेव्हा या विषाणूचा प्रभाव वाढला त्याला मुख्य कारण परदेशातून आलेले प्रवासी हेच होते हे विसरून चालणार नाही. सध्याही भारतातल्या फक्त कर्नाटकात या विषाणूचे दोन रुग्ण आढळले आहेत. ते दोघेही दक्षिण आफ्रिकेतून आलेले प्रवासी आहेत. साहजिकच हा संसर्ग आणखी पुढे वाढणार नाही याची जबाबदारी सरकारी पातळीवर निश्चितच घेतली जाईल. तरीसुद्धा प्रत्येकाने आपली वैयक्तिक जबाबदारी ओळखून ही कवचकुंडले परिधान केली तरच या नव्या विषाणूचा कोणताही धोका भारतीयांना होणार नाही.
जर सामान्य नागरिकांनी सरकारची नियमावली आणि आवाहनाला योग्य प्रतिसाद दिला नाही तर जे निर्बंध सध्या शिथिल करण्यात आले आहेत ते निर्बंध पुन्हा लागू होऊ शकतात ही साधी गोष्ट लक्षात ठेवायला हवी. पण दोन वर्षांचा अनुभव आता सर्वांच्याच गाठीशी असल्याने या विषाणूशी मुकाबला करण्याबाबत काय करायला हवे याबाबत एक मानसिकता निश्चितच तयार झालेली आहे. या मानसिकतेवर आधारित जी नियमावली तयार होईल त्याचे गांभीर्याने पालन करणे सर्व स्तरावर अत्यंत आवश्यक आहे.
सध्या हा विषाणू दक्षिण आफ्रिका आणि इतर युरोपीय देशांमध्ये थैमान घालत असल्याने या देशांमधून भारतात येणारे लोकच हा विषाणू भारतात आणू शकतात ही मूलभूत गोष्ट लक्षात ठेवूनच या विषाणूला विमानतळावरच नियंत्रित ठेवायची गरज आहे. पण तरीही काही कारणाने त्याचा भारतात शिरकाव झालाच तर त्याचा प्रतिबंध करण्यासाठी मूलभूत कवचकुंडले उपयुक्त ठरणार आहेत. साहजिकच आगामी कालावधीमध्ये मास्कचा गांभीर्याने वापर, सॅनिटायझरच्या माध्यमातून वैयक्तिक स्वच्छता आणि गर्दीमध्ये योग्य अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा वापर केला तरच या घातक अशा विषाणूला दूर ठेवता येऊ शकेल.