मुंबई: महाविकास आघाडीचे सरकार हे स्थित असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास ऊर्जामंत्री आणि कॉंग्रेस नेते नितीन राऊतांनी व्यक्त केला. आम्ही तिन्ही पक्ष कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करून एकत्र आलो आहोत. त्यामुळे भाजपने हे सरकार पाडून दाखवावे, असे आव्हानदेखील त्यांनी केले.
नितीन राऊत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सगळ्यांशी संवाद साधत आहे. हे सरकार पूर्णवेळ चालेल. आमच्यात कोणतीही नाराज नसून कोणाचीही मानहानी होत नाही. मात्र विरोधकांकडून अशा अफवा पसरविल्या जात असून ज्यांना कोणाला हे सरकार पाडायचं असेल त्यांनी पाडून दाखवावे. तसेच भाजप नेत्यांना त्यांचे नेते लक्ष देत नसतील. त्यामुळे मानहानी होत असेल, असा टोलाही राऊतांनी लगावला.
दरम्यान, वाढीव वीज बिलासंदर्भातही राऊत म्हणाले, महावितरण ही एक कंपनी आहे. करोनामुळे लोकांवर संकट आले आहे. वर्क फॉर्म होम किंवा लॉकडाऊनमुळे घरगुती विजेचा वापर जास्त झाला हे नाकारता येत नाही. तीन महिने बिल जास्त आले, असा अनेक लोकांचा आरोप आहे. मात्र जे सरासरी बिल असतं तेच दिलेले आहे.
वीजबिल भरताना 2 टक्के सूट
जे घर बंद होते, तिथे वीजबिल नव्याने देत कमी करण्यात येईल. वीजबिलाचे हप्ते भरण्यासाठी वेळ दिला जाईल. वीजबिल भरताना 2 टक्के सूट असेल. वीज कट करू नये या सूचना दिल्या आहेत. पण वीजबिल देणे गरजेचे आहे. तसेच मुंबई आणि राज्यात जर वीजबिल भरले नाही म्हणून जे लाईट कट करत असतील. त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही नितीन राऊत यांनी सांगितले.