नवी दिल्ली- उत्तर भारतामध्ये उष्णतेची प्रचंड लाट निर्माण झाली असून भारतीय हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील महिन्याच्या सुरुवातीला मान्सून देशात दाखल होणार आहे. परंतु त्यापूर्वीच वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील सहा दिवस उत्तर-पूर्व राज्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडणार आहे. तर 19 ते 24 मे दरम्यान आसाम, मेघालयमध्ये मुसळधार पाऊस पडेल. याशिवाय नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच मध्य भारताबद्दल बोलायचे झाले तर मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील विदर्भाचा भाग, आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये 22 मे रोजी हलका ते मध्यम पाऊस पडणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.