पुणे – शहरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हवेली सह दुय्यम निबंधक कार्यालयात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. यामुळे महत्वाचे हजारो दस्त आणि संगणक यंत्रणेला धोका निर्माण झाला होता. दरवर्षी पावसाळ्यात दोन ते तीन वेळा कार्यालयात पाणी शिरत असते. मात्र त्याची कोणतीही दखल घेतली जात नाही. पाणी शिरल्यावर नागरिकांचा खोळंबा होत असतो तसेच सरकारचा महसूलही बुडत असतो. यामुळे कार्यालय दुसरीकडे हलवाने अशी मागणी नागरिक आणि नागरिकांकडून होत आहे.
भारती हॉस्पिटच्या लगतच एका इमारतीच्या तळ मजल्यावर हवेली सह दुय्यम निबंधक कार्यालय आहे. बुधवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे कार्यालयात पाणी घुसले होते. हे पाणी आज सकाळपर्यत होते. तळमजला असल्याने दरवर्षी पावसात पाणी शिरत असते. येथील रेकॉर्डरुममध्ये हजारो नागरिकांचे महत्वाचे दस्त ठेवलेले आहेत. सध्या संगणक प्रणालिवर काम चालत असल्याने संगणक प्रणालीलाही पाण्याचा धोका निर्माण होतो. वायरिंग पाण्याखाली गेल्याने संगणक यंत्रणा विस्कळीत होऊन कामकाज थांबले. यामुळे नागरिकांचा खोळंबा होण्याबरोबरच सरकारचा महसूलही बुडतो. हे कार्यालय 2010 दरम्यान सुरु झाले आहे. तेव्हापासून येथे दरवर्षी हा प्रश्न निर्माण होतो. मात्र महसूल विभाग कोणतीही दखल घेत नाही. मागील दहा वर्षात कार्यालयात सातत्याने पाण्याखाली जात असताना ते दुसरीकडे हलवणे अपेक्षीत होते. येथे खरेदीखत, गहाण खत ,हक्कसोडपत्र अशी सर्व प्रकारची दस्त नोंदवली जातात. दिवसभरात 40 ते 60 नागरिक दस्त नोंदवण्यासाठी येत असतात.
पावासामुळे ड्रेनेज चोकअप होऊन कार्यालयात पाणी घुसले आहे. यामुळे आजच्या दिवसाचे कामकाज सुरु करता आले नाही. सध्या पाणी काढण्याचा प्रयत्न करत आहोत.कार्यालय येथून दुसरीकडे हलवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. -संतोष जाधव ( दुय्यम निबंधक)
कार्यालय हलवण्यासंदर्भात मुद्रांक शुल्क विभागाला अनेकदा पत्र लिहले आहे. सध्याचे सह दुय्यम निबंधक संतोष जाधव यांच्या कार्यकालातच तीन ते चार वेळा कार्यालय पाण्याखाली गेले आहे. तरही त्याची कोणतीच दखल घेतली जात नाही. मुद्रांक शुल्क विभागाच्या भोंगळ कारभारामुळे हजारो नागरिकांचे दस्त धोक्यात आहेत- ऍड.कल्याण शिंदे