जयपूर – भारतात वंशाचा दिवा म्हणून कायम मुलांच्या जन्माचं स्वागत केलं जातं. त्याचवेळी मुलीच्या जन्माने अनेक मातांना सासरच्यांचा छळाला सामोरं जावं लागते. मात्र आता काळ बदलला असून अनेक मुली खडतर परिश्रमाच्या बळावर आपल्या आई-वडिलांचं कष्टाचं चिज करताना दिसतात.
राजस्थानातील हनुमानगड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या पाचही मुलींची प्रशासकीय अधिकारीपदी निवड झाली आहे. पाच मुलींपैकी तीन मुलींची नुकतीच अधिकारीपदी निवड झाली आहे. तर दोन मुलींची आधीच निवड झालेली आहे.
भेरुसरी गावातील शेतकरी सहदेव सहारण यांना पाच मुली आहेत. त्यातील रोमा आणि मंजू आधीच राजस्थान प्रशासनात अधिकारीपदी आहेत. तर उर्वरित अंजू, सुमन आणि ऋतुका यांनी प्रशासकीय सेवेची परीक्षा दिली होती. या परीक्षेत तिघीही उत्तीर्ण झाल्या असून एकाचवेळी अधिकारी झाल्या आहेत.
एकाचवेळी तीन बहिणी अधिकारी होण्याची ही दुर्मिळ घटना आहे. शेतकरी सहदेव यांची मुलगी रोमा बीडीओ तर मंजू सहकार खात्यात अधिकारी आहे. आता बाकीच्या तीन मुली अधिकारी होणार असल्याने सहदेव यांच्या कष्टाचं चिज झाल्याची चर्चा पंचक्रोशित सुरू आहे.
दरम्यान शेतकरी सहारण कुटुंबीय सध्या कामानिमित्त काही दिवसांसाठी जयपूर येथे आहे. ते जेव्हा हनुमानगढला घरी परततील तेव्हा त्यांचे भव्य स्वागत करण्याचं नियोजन हनुमानगड जिल्ह्यातील लोकांनी केलं आहे.