नगर – पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाची वारकऱ्यांना आस लागली असून, अनेक दिंड्या पंढरपूरकडे निघाल्या आहेत. नगर जिल्ह्यातील 260, तसेच अन्य जिल्ह्यांतील 27 दिंड्या नगरमधून जात आहेत. एकीकडे भक्तिमय वातावरण असताना नगर-औरंगाबाद महामार्गावर गजराजनगर परिसरातील रस्त्याकडेला सध्या टाकाऊ मांस, तसेच कचऱ्याचे ढीग साचल्याने यातून पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे नाकाला रुमाल बांधून भाविकांना मार्गस्थ होण्याची वेळ येत आहे. भाविकांचे हाल पाहून बुऱ्हाणनगर ग्रामपंचायत व पोखर्डी ग्रामपंचायतीच्या वतीने कचऱ्याचे ढीग हटविण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिंड्यांची गैरसोय होणार नाही याबाबत जिल्हा प्रशासनास सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कंबर कसली होती. मात्र, नगर-औरंगाबाद रस्त्यावर गजराजनगर येथील रस्त्याच्या कडेला अनेकांनी कचरा टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे येणाऱ्या वारकऱ्यांना नाकावर हात ठेवूनच मार्गस्थ व्हावे लागत आहे.
याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी श्रीकांत खरात व विस्तार अधिकारी तुपे, चंद्रकांत खाडे यांच्या सूचनेनुसार पोखर्डी, तसेच बुऱ्हाणनगर ग्रामपंचायतीतर्फे येथील परिसराची जेसीबीच्या साह्याने स्वच्छता करण्यात आली. या वेळी पोखर्डीचे ग्रामसेवक सचिन पवार, शेळके उपस्थित होते.
…तर गुन्हा दाखल
नगर-औरंगाबाद रस्त्यावरील पोखर्डी, तसेच बुऱ्हाणनगर परिसरात सार्वजनिक ठिकाणी मांस विक्रेत्यांकडून, तसेच विविध प्रकारचा कचरा टाकल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी सचिन पवार यांनी सांगितले.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. वाऱ्यामुळे इतरत्र कचरा पसरत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना या दुर्गंधीचा त्रास होत असल्याचे प्रवाशांमधून बोलले जात आहे. अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.