मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्य सरकारच्या एका निर्णयावरून राज्यात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने सुपरमार्केट मध्ये वाईन विक्रीची परवानगी दिली आहे. त्याला भाजपने मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे. या वादात आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे. सरकारच्या या निर्णयावर सडकून टीका केली आहे.
अमृता फडणवीस लोणावळा येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी,“वाइन ही दारू असून सुपर मार्केटमध्ये ठेवण्याची गरज नाही. तिथं लहान मूल, महिला जातात. दुकानात वाइनला परवाना देऊन हे सरकार काही लोकांचा फायदा करत आहे. नागपूरमध्ये सुपर मार्केट असोसिएशनने वाइन ठेवणार नाही,” असे सांगत अमृता फडणवीस यांनी वाइनवरून महाविकास आघाडीला घेरले आहे. विद्यार्थी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे हे सरकार दुर्लक्ष करत आहे. अन्यथा आजची वेळ विद्यार्थ्यांवर आली नसती, असे देखील त्यांनी नमूद केले.
अमृता फडणवीस म्हणाल्या, “विद्यार्थी, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न राज्यसरकार दुर्लक्षित करत आहे. काही मूठभर लोकांच्या फायद्यासाठी हे सरकार झटत आहे. आजची परिस्थिती विद्यार्थ्यांवर यायला नको होती. दुकानात वाइनला परवाना देऊन शेतकऱ्यांच्या नावाने काही लोकांचा फायदा केला जातोय. हे अयोग्य आहे. नागपूर सारख्या शहरात सुपर मार्केट असोसिएशन वाइन ठेवणार नाही असे म्हणत आहे.”
“जे जागरूक नागरिक आहेत ते यापासून लांब राहतील. शेवटी वाइन ही दारूच आहे. सुपर मार्केटमध्ये लहान मूलं, महिला येतात. तिथं वाइनची गरज नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आहे. त्यामधील अर्ध्या नेत्यांना माहिती नसतं नेमकं की महाराष्ट्रात काय सुरू आहे,” असं म्हणत अमृता फडणवीसांनी ठाकरे सरकारला टोला लगावला.