माधव विद्वांस
समीक्षक, अनुवादक तसेच इंग्रजी वाङ्मयाचे अभ्यासक यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म हातकणंगले (जि. कोल्हापूर) येथे 1 फेब्रुवारी 1927 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण हातकणंगले येथे, माध्यमिक कोल्हापूर येथे तर सांगलीच्या प्रताप मॉडेल हायस्कूलमधून 1944 मध्ये साली ते मॅट्रिक झाले. सांगलीच्या विलिंग्डनमधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले व 1952 साली त्यांनी इंग्रजीत एम.ए.ची पदवी प्राप्त केली. प्रामुख्याने समीक्षा, ललित लेखन, अनुवाद व संपादन असे विविध स्वरूपात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या अध्यापन कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी धारवाड येथील कृषी महाविद्यालयात इंग्रजीचे अध्यापन केले (1952-56). त्यानंतर विलिंग्डन महाविद्यालय,
सांगली येथे इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून हजर झाले व 1973 ते 1978 या कालावधीत ते प्राचार्य झाले व तेथेच निवृत्त झाले. त्यांच्या लेखनाला महाविद्यालयीन काळातच प्रारंभ झाला. समीक्षेसाठी त्यांच्या पुढे आलेल्या साहित्यास त्यांनी योग्य न्याय दिला. साहित्यातील गुणदोषांचे प्रामाणिकपणे समीक्षण केले. त्यामुळे स्वागतशील वृत्तीचे आस्वादक समीक्षक म्हणून ते प्रसिद्ध होते. व्यापक वाङ्मयीन दृष्टिकोन तसेच पूर्वग्रह दूषित न ठेवता मर्मग्राही समीक्षावृत्ती ही त्यांच्या समीक्षेची मुख्य वैशिष्ट्ये होत. विशेषतः जी. ए. कुलकर्णी यांची कथा यांबद्दल त्यांनी लिहिलेली समीक्षा अतिशय मार्मिक व मौलिक स्वरूपाची आहे. हातकणंगलेकर हे सातत्याने नव्या पुस्तकांची दखल घेणारे समीक्षक म्हणून ओळखले जात होते. तसेच नव्या पिढीचे ते मार्गदर्शक होते.
“माचीवरला बुधा’ (गोनिदा), “सती’ (व्यंकटेश माडगूळकर), “किरवंत’ (गज्वी) इ. वाङ्मयकृतींचे इंग्रजी अनुवादही त्यांनी केले. त्यांनी क्वेस्ट, न्यू क्वेस्ट, थिएटर युनिट्स बुलेटिन यांतून इंग्रजीत लेखन केले. त्यांच्या ललित लेखनांत प्रामुख्याने व्यक्तिचित्रण आहे. त्यांनी काही प्रभावी व्यक्तिचित्रे रेखाटली असून त्यांतून त्यांचे मानवी स्वभावाच्या विविधप्रकारांचे बारकाईने केलेले मार्मिक निरीक्षण दिसून येते. त्यांच्या “उघडझाप’ या आत्मकथनपर पुस्तकात त्यांचे नातलग व स्नेहीजन यांची हृद्य व्यक्तिचित्रे आहेत. “साहित्यसोबती’ व “आठवणीतली माणसं’ हे त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांचे संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी काही महत्त्वपूर्ण ग्रंथ-संपादन केली आहेत.
“विचारधारा’ प्रभाकर पाध्ये यांचे निवडक लेख, “वाङ्मयीन शैली आणि तंत्र’, “मराठी साहित्य : प्रेरणा व स्वरूप’ (गो. मा. पवार यांच्या सहकार्याने), “डोहकाळिमा’ (जी. ए. कुलकर्णी यांच्या निवडक कथा), “श्री. दा. पानवलकर : निवडक कथा’, “निवडक मराठी समीक्षा’ (1999, गो. मा. पवार यांच्या सहकार्याने), “जी. एं. ची निवडक पत्रे : खंड 1 ते 4′ तसेच “उगवाई’ या वाङ्मयीन मासिकाचे संपादनही त्यांनी केले.
त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. तसेच काही जबाबदारीची पदेही त्यांनी स्वीकारली होती. महाराष्ट्र शासनाचा “आदर्श प्राध्यापक’ पुरस्कार (1976) “साहित्यविवेक’ या ग्रंथासाठी महाराष्ट्र फाउंडेशनचा ग्रंथ पुरस्कार (1998), सांगली भूषण पुरस्कार (2014) इत्यादी. सांगली येथे भरलेल्या 81व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते (2008). तसेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, साहित्य अकादमी समिती, ज्ञानपीठ मराठी समिती इ. अनेक संस्थांचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले. 25 जानेवारी 2015 रोजी त्यांचे निधन झाले.