पुणे-डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालय राज्यसरकारच्या परवानगीविना बेकायदेशीररित्या स्थलांतरीत करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. “आरपीआय’ने त्याला विरोध केला असून पर्यायी संपूर्ण सिद्धता असलेले सांसर्गिक रुग्णालय उपलब्ध असेल तरच हे स्थलांतरित करावे अशी त्यांची मागणी आहे.
नियोजित भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय डॉ. नायडू रुग्णालयाच्या आवारात उभारण्यात येणार आहे. त्यासाठी डॉ. नायडू रुग्णालय स्थलांतरित करणे आवश्यक आहे. त्यामुळे घाईघाईने हे रुग्णालयातील साहित्य बाणेर येथील महापालिकेच्या एका इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्याला सुरूवात करण्यात आली आहे.
हे संसर्गजन्य आजारावरील रुग्णालय आहे. अशाप्रकारची रुग्णालये कशी असावीत याबाबत केंद्र आणि राज्य सरकारने काही नियमावली तयार केली आहे. संपूर्ण राज्यात अशी संसर्गजन्य रुग्णालये दोन आहेत. त्यापैकी एक नागपूर आणि दुसरे पुण्यात आहे. नियोजित वैद्यकीय रुग्णालयासाठी हे नायडू रुग्णालय स्थलांतरीत करण्यासाठी घाई सुरू आहे. परंतु, ते जिथे स्थलांतरीत करणार ती जागा, ते रुग्णालय सांसर्गिक रुग्णालयांच्या नियमाप्रमाणे आहे का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
या ठिकाणी अन्य संसर्गजन्य आजार असलेले आणि कोविड रुग्णही आहेत. बाणेरला ज्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात येणार आहे तेथे एका इमारतीमध्ये असे दोन आजारांचे रुग्ण राहू शकतील का, हा प्राथमिक मुद्दा आहे. सार्स, इबोला, स्वाइनफ्लू आणि आता करोना काळात डॉ. नायडू रुग्णालयाची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. असे असताना हे स्थलांतर हे “पॉलिसी डिसीजन’ आहे.
वैद्यकीय महाविद्यालयासाठी स्थापन केलेल्या “ट्रस्ट’ने हा निर्णय घेतल्याचे उत्तर आरोग्य विभागप्रमुख आणि नियोजित वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी दिले आहे. मात्र “ट्रस्ट’ने केवळ वैद्यकीय महाविद्यालयाविषयीचे निर्णय घ्यायचे आहेत, डॉ. नायडू रुग्णालय स्थलांतरण वगैरे विषय हा राज्यसरकारच्या अखत्यारीतील आहे. त्यामुळे त्यांची परवानगी वैद्यकीय महाविद्यालयाला आमचा अजिबात विरोध नाही. परंतु, डॉ. नायडू रुग्णालय स्थलांतरीत करायचे असेल तर ज्या ठिकाणी ते करायचे असेल ते राज्यसरकारच्या नियमांप्रमाणे असले पाहिजे, अन्यथा नाही. – डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका