पुणे – जवळपास अर्ध्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा शनिवारी सकाळी दीड तास खंडीत झाला. यामुळे शहराच्या बहुतांश भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. तर काही भागात सायंकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवण्यात आले. दरम्यान, या ठिकाणी वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याचे सांगण्यात आले.
पर्वती जलकेंद्रातून लष्कर, चतु:शृंगी, पद्मावती, एरंडवणे भागांसह सर्व पेठा आणि शिवाजीनगरच्या काही भागात पाणीपुरवठा केला जातो. या जलकेंद्राची क्षमता सुमारे 650 एमएलडी असून, जवळपास 55 टक्के शहर यावरच अवलंबून आहे. शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास येथील मुख्य वीज वाहिनीत बिघाड झाला. परिणामी, जलकेंद्र दीड तास बंद राहिले. यामुळे इतर टाक्यांपर्यंत पाणीच गेले नाही.
नंतर वीजपुरवठा सुरूळीत झाला तरी टाक्या भरण्यासाठी चार तास लागले. त्यामुळे वेळापत्रक चार ते पाच तासांनी कोलमडले. अनेक भागांत वेळापत्रकानुसार पाणीच न आल्याने नागरिकांची कोंडी झाली. दरम्यान, अनेक भागात अर्धा ते एक तासच पाणी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, कमी दाब असल्याने नागरिकांना शनिवारी पुरेसे पाणी मिळू शकले नाही.