येरवडा – महापालिकेच्या नियमाप्रमाणे गुरूवारी पाणी बंद होत तर भामा आसखेड जलवाहिनी नादुरुस्त झाल्याने शुक्रवारी दिवसभर वडगावशेरी, खराडी, विमाननगर, टिंगरेनगर, विश्रांतवाडी, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड येथील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. शनिवारी दुपारी काही भागातील पाणी पुरवठा सुरळीत झाला. परंतु, त्यानंतरही चाकरमान्यांचे पाण्यावाचून हाल झाले.
भामा आसखेड जलवाहिनी प्रकल्पाची लाइन गळती झाल्याने गुरुवारी पाणी बंदच्या दिवशी दुरूस्तीचे काम हाती घेतले होते. मात्र, त्या कामानंतर त्याच लाइनवर दुसरीकडेही गळती असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ती दुरुस्तीही करण्याचे काम सुरू झाले. परंतु, याकामी किती वेळ लागणार याचा अंदाज चुकल्याने या जलवाहिनीवर अवलंबून असलेल्या हजारे नागरिकांना तब्बल तीन दिवस पाणी पुरवठाच होऊ शकला नाही.
गुरुवारी पाणी बंद असल्याने अनेकांनी बुधवारी केलेला पाणीसाठा शुक्रवारीच संपला. त्यामुळे शनिवारी अनेकांच्या घरात खडखडाट झाला होता.पिण्याचे पाणीही शिल्लक नव्हते. त्यामुळे शनिवारी सकाळी नागरिकांना घरातील भांडी घेऊन पाण्याच्या शोधात बाहेर पडावे लागले. मिळेल तेथून पाणी आणण्याची रिक्षा, मोटरसायकल यावर मोठी कसरत करावी लागली. अनेकांनी पाण्याचे मोठे जार विकत घेतले. जलवाहिनीच बंद असल्याने पाणी भरण्याचे पॉइंटही बंद होते त्यामुळे नागरिकांना टॅंकरही मागवता आले नाहीत. तीन दिवसाच्या अघोषित पाणी बंदमुळे टिंगरेनगर, धानोरी, वडगावशेरी, विमाननगर येथील नागरिकांनी मनपा, जल विभागच्या कामाबाबत मोठा संताप व्यक्त केला. याबाबत लोकप्रतिनिधींनी प्रशासनास सूचना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मेसेज आलेच नाहीत…
पुणे महापालिकेने गुरुवारी पाणी बंदची घोषणा केल्यानंतर अनेक सामाजिक कार्यकर्ते आदल्या दिवशीच पाणी बंद असल्याचे मेसेज सोशल मिडियावर टाकत असतात. मात्र, शुक्रवारी पाण्याची वाट पाहत असलेल्या नागरिकांना असे कोणतेच मेसेज आले नाहीत. शनिवारी काम पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांशी बोलुन झाले आहे, दुपारनंतर पाणी सुरळीत होईल, असे मेसेज यायला सुरूवात झाली. मात्र, तोपर्यंत नागरिकांना जो त्रास झाला तो झालाच.