कराची- पाकिस्तानातील जवळपास निम्म्या कुटुंबांना दारिद्रयामुळे दोन वेळचे जेवणही मिळवणे मुश्कील झाले आहे. याचा फटका देशातील बहुसंख्य बालकांच्या पोषणावर होतो आहे. प्रत्येक 10 पैकी चौथ्या बालकाची वाढ खुंटली आहे. शिक्षण आणि जागरुकतेच्या अभावामुळे बालकांची वाढ खुंटली आहे आणि त्या बालकांचे वाढ सुदृढ होणे अवघड बनले असल्याचा अहवाल पकिस्तानातील प्रसिद्धी माध्यमांनी प्रसिद्ध केला आहे. अशा स्वरुपाच्या पहिल्याच सर्वेक्षणामध्ये पाकिस्तानातील ही धक्कादायक स्थिती उजेडात आली आहे.
नॅशनल न्यूट्रीशन सर्व्हे 2018’मध्ये देशतील 50 टक्के कुटुंबांना दरिद्रयामुळे दोन वेळचे जेवणही मिळवणे मुश्कील झाले आहे आणि परिणामी आहारातील पोषण मूल्ये नष्ट होत आहेत. देशातील 40.2 बालके तीव्र कुपोषणाचे बळी ठरले आहेत. त्यामुळे या बालकांची वाढ खुंटली आहे. याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक विकासावर होतो आहे, असे या सर्वेक्षणामध्ये आढळून आले आहे. राष्ट्रीय अरोग्य सेवा मंत्रालयाच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये ही बाब उघड झाली आहे.
पाकिस्तानातील 36.9 टक्के घरांमध्ये पूरक आणि पोषक अन्न उपलब्ध नाही, असेही या सर्वेक्षणामध्ये आढळलेले आहे. पाकिस्तानातील नवजात अर्भके, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता आणि 5 वर्षांखालील बालकांमध्ये कुपोषणाच्या वाढत्या समस्येकडे लक्ष वेधणे हा या सर्वेक्षणाचा मूळ हेतू होता. पाकिस्तानातील चारही प्रांतांमधील शहरी तसेच ग्रामीण भागाबरोबरच गिलगीट-बाल्टीस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्येही हा व्यापक सर्वेक्षण करण्यात आले होते. आर्थिक विपन्नावस्थेमुळे पाकिस्तानला अलिकडेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून 6 अब्ज डॉलरचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे.