नवी दिल्ली: जवळपास अर्धी भारतीय लोकसंख्या नोकरी किंवा कमाईच्या स्रोताशिवाय एका महिन्यापेक्षा जास्त काळ राहू शकत नाही. अनेक दिवसांचा लॉकडाऊन आणि घसरत चाललेली अर्थव्यवस्था शिवाय शून्य झालेले उत्पन्न यामुळे आणखी किती दिवस कुटुंबाचे पालनपोषण होणार याची चिंता जवळपास सर्वांनाच आहे.
आयएएनएएस सीवोटर इकॉनॉमीच्या सर्व्हेनुसार 28 टक्के पुरुषांचे म्हणणे आहे की, कमाईशिवाय ते एक महिनाही राहू शकत नाहीत. तर 20 टक्के पुरुषांनी म्हटले आहे की, ते एका महिन्यापर्यंत कमाईविना राहू शकतात. 10 टक्के पुरुषांनी कमाईविना एका वर्षापर्यंत राहू शकत असल्याचे म्हटले आहे. 15 टक्के लोकांनी दोन महिन्यांपर्यंत कमाईशिवाय राहू शकत असल्याचे या सर्व्हेद्वारे समोर आले आहे.
यात चांगले उत्पन्न असलेल्या उच्चशिक्षित वर्गाचे असे म्हणणे आहे की, ते खूप जास्त दिवस कमाईशिवाय राहू शकतात. अशांची टक्केवारी 30 आहे. नोकरी करणाऱ्या अर्ध्या महिलांनी सांगितले की, त्या एका महिन्यापेक्षा जास्त दिवस कमाईशिवाय राहू शकत नाहीत. तर उच्च वेतन असणाऱ्या महिलांनी म्हटले आहे की, त्या एका वर्षापर्यंत कमाईशिवाय राहू शकतात. अर्ध्या ज्येष्ठ नागरिकांनीही एका वर्षापर्यंत बचत असल्याचे सांगितले आहे.
खरे तर लॉकडाऊनमुळे सर्वांनाच आर्थिक झळ सोसावी लागत आहे. याचा सर्वाधिक फटका गरीब आणि मध्यमवर्गाला बसला आहे. आजही भारतात अशी अर्धी अधिक लोकसंख्या आहे जी हातावर पोट भरते. त्यामुळे कमाईविना ते जास्त दिवस राहू शकत नाहीत.