जळोची -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्धसत्य बोलले आहेत. मात्र, अर्ध वर्ष झाल्यानंतर ते अर्धसत्य बोलले आहेत. फडणवीस यांनी तेच जर सुरुवातीला बोलले असते तर लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसला असता. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य करून सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे जनतेचे म्हणणं आहे. ते त्यांचे वक्तव्य खरं नाही, असे आमचं सर्वांचे म्हणणं आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी बारामतीत दिली.
पहाटेच्या शपथविधीला शरद पवार यांची संमती होती. असा गौप्यस्फोट नुकताच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे. यावर आमदार पवार यांनी ही प्रतिक्रिया देत फडणवीस यांना टोला लगावला.
पवार म्हणाले की, माझ्या ट्विटचा अर्थ मीडियाने आणि सामान्य माणसांनी भूकंप असा घेतला आहे.
जे प्राणी जंगलामध्ये राहतात. त्यांना अगोदरच माहिती असते. भूकंप येणार आहे. त्या अनुषंगाने मी बोललो होतो. सध्याचे सत्ताधारी आमदार आहेत. ते आधी वेगळे बोलायचे. परंतु आता वेगळं बोलत आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वाट बघावी लागते. एकाच पक्षाच्या फाईल क्लिअर होतात. फायली क्लिअर करण्याला गती आली आहे.
आमदार पवार म्हणाले की, ज्यावेळेस अस्थिरता असते. त्यावेळेस अशी गती येते. सर्व गोष्टी बघितल्यानंतर राजकीय भूकंपा होईल का, असा प्रश्न मी उपस्थित केला आहे. कोकणातली जागा ही शिंदे गटाची असताना ती जागा भाजपने स्वतःकडे ठेवली. कोर्टामध्ये विषय पेंडिंग आहे. दुसरीकडे सगळ्यांना मंत्रिपद हवे आहे.
त्यामुळे मंत्रीपद कोणा कोणाला देणार, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे बाकीच्यांना खेळवत ठेवू अशी रणनीती असू शकते. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचे नुकसान होत आहे. मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे सर्वसामान्य लोकांची कामे पेंडिंग राहतात, असा चिमटा त्यांनी काढला.
कसब्यात भाजपचे समीकरण लोकांना पटले नाही
आमदार पवार म्हणाले की, चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत लोकांची सहानुभूती जगताप कुटुंबीयांना नक्कीच आहे. परंतु ते भाजपाला मतदान करतील, असे नाही. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला संधी दिली आहे. परंतु त्यांची क्षमता आहे का, याचा अंदाज सर्वसामान्य लोकांना लागला आहे.
सहानुभूती जरी जगताप यांच्या बाजूने असली तरी स्थानिक जनता ही भाजपचा विरोध करते. येणाऱ्या काळात तो फरक आपल्याला दिसेल. कसबा मतदारसंघात जे समीकरण भाजपने पुढे आणले आहे. ते तिथल्या लोकांना पटले नाही. त्यामुळे तिथे देखील भाजपच्या विरोधात निकाल लागेल.