जामखेड (प्रतिनिधी) – जामखेड तालुक्यातील नान्नज, जवळा, हळगाव, शिऊर, राजेवाडी, पाडळी, राजुरीसह अनेक गावात वादळी वाऱ्यासह गारपीट व पाऊस झाला. त्यामुळे या गावात अनेक ठिकाणी वीजेचे पोल, घरांचे पत्रे व झाडे उन्मळून पडली.तसेच नाहुली येथील शेतकरी राजेंद्र दशरथ जाधव यांच्या अंगावर वीज पडल्याने ते जखमी झाले.
रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास अचानक ढग दाटले. तालुक्यातील शिऊर, हळगाव, पाडळी, सावरगाव, कुसडगाव, झिक्री, नान्नज, दैवदैठण, धोंडपारगाव, राजुरी, नान्नज, जवळा, राजेवाडी या परिसरात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. शहरातील बसस्थानकाजवळील साईबाबा हॉस्पिटल समोरील रस्त्यावरील झाड वादळी वाऱ्यामुळे कोसळले.
जामखेड खर्डा या राज्य मार्गावरील राजुरी या ठिकाणी वादळाने वडाचे झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ जीवनावश्यक वाहनांची वाहतूक बंद झाली होती. तालुक्यातील पाडळी येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक झाडे कोलमडून पडली असून गारपीटीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता शेतकऱ्यांतून वर्तविण्यात येत आहे.तसेच जामखेड तालुक्यातील शिऊर येथील बिंडावस्तीवर देखील मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाला. तसेच शिऊर येथील शेतकरी सोमनाथ तनपुरे यांच्या पॉलिहाऊसचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हळगाव, पाडळी येथे दुपारी जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या अवकाळी पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. जवळा या ठिकाणी देखील वादळाने अनेक घरांच्या पत्र्याचे शेड उडुन गेले आहे. जवळा व गोयकरवाडी परिसरात तूफान वादळी वाऱ्यामुळे वीजेचे खांब देखील मोडून पडले.
सर्वत्रच करोनाचा प्रादुर्भावाने मोठ्या संकटात सापडला असताना आता हातातोंडाशी आलेला घास गारपीटीने हिसकावून घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडत आहे. या गारपीटीत टरबूज, खरबूज, भाजीपाला इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात गारपीटीने झालेल्या पिकाच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. तसेच तालुक्यातील गारपीट झालेल्या भागात तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी भेट देऊन पहाणी केली आहे.