ऐझावल – मिझोरममधील एकमेव करोनाबाधित रुग्णाला शनिवारी प्रकृती ठणठणीत झाल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामुळे मिझोरम देशाच्या ईशान्य विभागातील पाचवे करोनामुक्त राज्य ठरले आहे.
मिझोरममध्ये आतापर्यंत केवळ एक करोनाबाधित आढळला होता. त्या रुग्णावर तब्बल 45 दिवस ऐझावलमधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्याच्या सलग चार चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. पूर्ण बरा झाल्याने त्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला.
करोनामुक्त झालेला रुग्ण मार्चमध्ये नेदरलॅंडमधून परतला. त्यानंतर काही दिवसांनी करोना चाचणीत तो पॉझिटिव्ह आढळला होता. आता मिझोरमही करोनामुक्त ठरल्याने ईशान्य विभागाला मोठाच दिलासा मिळाला आहे. याआधी त्या विभागातील मणिपूर, सिक्कीम, नागालॅंड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांनी करोनामुक्त होण्याचा मान मिळवला.
आता ईशान्येतील आसाम, मेघालय आणि त्रिपुरा या केवळ तीन राज्यांमध्येच करोनाबाधित आहेत. त्रिपुरात सर्वांधिक 118 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील दोघे याआधीच बरे झाले आहेत. आसाममध्ये 59 बाधित आहेत. त्यातील 34 रुग्ण करोनामुक्त झाले. तर एकाचे निधन झाले. मेघालयात 13 करोनाबाधित आढळले. त्यातील 10 जण बरे झाले. तर एकाचा मृत्यू झाला.