रेठरे/तांबवे – कराड तालुक्यामध्ये दक्षिण विभागातील काले, विंग, तसेच लगतच्या तांबवे भागातही गुरुवारी दुपारी गारपीट व सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पडलेल्या वळीवाच्या पावसामध्ये मोठे नुकसान झाले. सुमारे तासभर पडलेल्या या पावसात केळी व आडसाली ऊस पिकांसह अन्य पिकांचेही मोठे नुकसान झाल्याने कृषी विभागाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
कराड दक्षिणमधील काले विभागातील काले, वाठार, रेठरे खुर्द, मालखेड, बेलवडे बुद्रुक, कालवडे व कासारशिरंबे या गावांसह धोंडेवाडी, येरवळे, किरपे. तांबवे, पश्चिम दक्षिण व उत्तर तांबवे, गमेवाडी अडी. गावात गारपीटीसह सोसाट्याच्या वारा आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. तासाभरात झालेल्या विक्रमी गारपीटीने केळी, ऊस पिकांची पाने फाटली असून त्यांच्या वाढीवर परिणाम होणार आहे. शेतातील सऱ्यांमध्ये गारांचा थर लागल्याचे दिसून आले. या पावसात प्रामुख्याने आडसाली ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर मका, टोमॅटो, कलिंगड आदींसह आंब्याचेही नुकसान झाले आहे.
गेल्या आठ-दहा दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढल्याने पारा 35 ते 39 अंशांपर्यंत पोहोचल्याचे दिसून आले. त्यामुळे वाढत्या उष्म्यासह नागरिक पुरते हैराण झाले होते. अशातच हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा अवकाळीसह गारपीटीचा इशारा दिला होता. त्यानुसार गेल्या दोन-चार दिवसांपासून कराड तालुक्यात ढगाळ हवामान आहे.
गुरुवारी दुपारी तीन-चार वाजण्याच्या सुमारास कराड तालुक्याच्या दक्षिण भागासह लगतच्या भागात जोरदार वळीवाचा पाऊस झाला. यामध्ये बेलवडे बुद्रुक ता. कराड येथील शेतकरी राजेंद्र डुबल यांची साडेतीन एकरात असलेल्या केळीच्या बागेचे मोठे नुकसान झाले. लाखो रुपये खर्चून, काबाडकष्ट करून आणलेले सोन्यासारखे केळीचे पिक वळीवाने डोळ्यादेखत भुईसपाट केले. या पावसाने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे पडून त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला.
दरम्यान, या भागासह अन्यत्र आडसाली ऊस पिकही भुईसपाट झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर मका, टोमॅटो, कलिंगड आदींसह कच्चे आंबे पडूनही नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी विभागाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
कराडमध्ये दोन ठिकाणी पडली वीज
गुरुवारी शहरात दुपारी चारनंतर विजांच्या कडकडाटासह वळीवाचा पाऊस पडला. यावेळी शहरातील सोमवार पेठेतील पंताचा कोट परिसरात व शुक्रवार पेठेत नारळाच्या दोन झाडांवर वीज पडल्याने झाडे जळाली. कराड पालिकेच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत झाडावरील आग विझवली. दुपारी चारनंतर विजांच्या कडकटात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाच्या शिडकावाने काहीसा दिलासा मिळाला.
गारपीट, सोसाट्याचा वारा आणि वळीवाच्या पावसाने साडेतीन एकर केळी पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. त्यामुळे कृषी विभागाने तात्काळ सदरच्या नुकसानीचे पंचनामे करावेत. तसेच शासनाने जास्तीत-जास्त नुकसान भरपाई द्यावी.
– राजेंद्र डुबल (शेतकरी, बेलवडे बुद्रुक)