मुंबई – मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका माध्यम समुहाच्या विशेष कार्यक्रमात राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे पुत्र व माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे त्यांनी अनेक विषयांवर आपली स्पष्ट भूमिका मांडताना भारतीय जनता पार्टीबद्दल त्यांच्या मनात अजुनही असलेला सॉफ्ट कॉर्नर दाखवून दिला तर ठाकरेंना सत्तेतून खाली खेचणाऱ्या शिंदे गटाबाबत पुन्हा एकदा गद्दार याच शब्दाचा उपयोग केला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी उध्दव ठाकरे आणि त्यांचे स्वत:चे आजही चांगले संबंध आहेत. राज्यात जेव्हा आमचे सरकार होते तेव्हाही केंद्र आणि राज्य सरकारमध्ये योग्य समन्वयाने काम झाले. मात्र आता बरेच प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेले आहेत. जेव्हापासून राज्यात असंवैधानिक सरकार आले आहे तेव्हापासून राज्यात गुंतवणूक करण्यास कोणी इच्छूक नाही. केंद्र सरकारशी योग्य समन्वय यांना ठेवता आला नाही हे यांचे अपयश आहे. आम्ही सरकारमध्ये होतो तेव्हा याच चांगल्या समन्वयामुळे राज्यात 6 लाख कोटींची गुंतवणूक आली.
फडणवीसांची बदनामी होतेय –
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ते खूप अनुभवी आहेत. त्यांच्यासोबत काम केले आहे. मात्र ते या सरकारशी अजुनही जोडले गेले असल्याचे पाहुन आश्चर्य वाटते. त्यांची बदनामी होतेय, त्यांना ट्रोल केले जाते आहे. त्याचे वाईट वाटते. हे पाहण्याची माझी इच्छा नाही. जर भारतीय जनता पार्टी आमच्यासोबत असती तर फडणवीस आज मुख्यमंत्री असते. निवडणुकीच्या अगोदरच आमचे ठरले होते की अडीच वर्षे आमचा तर अडीच वर्षे त्यांचा मुख्यमंत्री. आमची अडीच वर्षे झाली. आता तेच मुख्यमंत्री झाले असते. मात्र त्यांना काही वेगळेच मान्य होते.
त्यांनी राजीनामा द्यावा –
दरम्यान, शिंदे गटाचा त्यांनी पुन्हा एकदा गद्दार असा उल्लेख करत त्यांनी राजीनामे द्यावेत असे आव्हान दिले. आपणही राजीनामा देऊ वस्तूस्थिती सगळ्यांच्या समोर येईल असे आदित्य म्हणाले. गद्दारांनी जनादेश चोरला आहे. जनता आजही उध्दव ठाकरे आणि शिवसेनेसोबत आहे. पूर्ण राज्यात आता निवडणुका व्हाव्यात अशी आमची इच्छा नाही. मात्र 41 जागांवर निवडणुका झाल्या पाहिजेत असे त्यांनी सांगितले.