पुणे – ढोलताशे, डॉल्बी, स्पीकर्स यांचा मानवांवर जसा परिणाम होत आहे तसा प्राणी-पक्षांच्या अधिवासावर देखील परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे याचे वाढते प्रमाण नियंत्रित केले जावे अशी मागणी आता मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आहे. गोकुळाष्टमी, गणेशोत्सव यासारख्या सणांसाठी ढोलताशा पथकांचा सराव जोरदार सुरू आहे. ढोलताशा पथकांना विरोध नाही, परंतु सणांच्या आधी चाळीस-पन्नास दिवस सराव आणि त्याचे ध्वनिप्रदूषण याचा त्रास होत असल्याची तक्रार केली जात आहे.
लाऊडस्पीकरचीही तक्रार अशीच आहे. रात्री 10 वाजल्यानंतर वाजवले जाणारे डॉल्बी, लाऊडस्पीकर यावरही नागरिकांनी आता आक्षेप घेण्याला सुरूवात केली आहे. पूर्वी या गोष्टी मर्यादित स्वरूपात होत्या. त्यामुळे याला समाजमान्यता मिळाली. परंतु आता त्याचा अतिरेक होत असल्याने त्याला मोठ्याप्रमाणात विरोध होण्याला सुरूवात झाली आहे. दशकांपूर्वी या गोष्टी सुरू झाल्या आणि त्याला समाजमान्यता मिळाली. परंतु आता गल्लीबोळात पथके स्थापन झाली आणि त्याची अहमहमिकाच सुरू झाली. कुरघोडी, भांडणे हे त्या अनुषंगाने आलीच.
या पथकांच्या आवाजाचा आता मनुष्यप्राण्यावरच नव्हे तर प्राणी पक्षांवरही परिणाम होत आहे. कात्रज येथील स्व. राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांबाबत हा विषय अधिक महत्त्वाचा आहे. या संग्रहालयाच्या आजूबाजूला विविध मंडळे सराव सत्र आयोजित करतात आणि प्राणी, पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांना मोठ्या आवाजाचा धोका निर्माण करतात.
ध्वनी प्रदूषणाचा सस्तन प्राण्यांवर परिणाम होतो आणि किंगफिशर, स्पॅरो, वायर-टेलेड स्वॅलो, वॅगटेल यांसारखे छोटे पक्षी अत्यंत घाबरतात आणि ते उडून गेल्याने त्यांचा अधिवास गमावतात. जमिनीवर अंडी घालणारे पक्षी प्रजनन करत नाहीत. पाण्यातील कोंबड्या हे नैसर्गिकरित्या लाजाळू पक्षी आहेत, तेही दूर जातात. आवाजामुळे पाण्यामध्ये कंपन निर्माण होऊन जलचरांना त्रास होतो – शैलेजा देशपांडे, संस्थापक, “जीवितनदी लिव्हिंग रिव्हर फाउंडेशन’
प्राणी-पक्षी आवाजाच्या बाबतीत अतिशय संवेदनशील असतात. त्यामुळे अधिकारी आणि नागरिकांनी या समस्येचा अधिक संवेदनशीलतेने विचार केला पाहिजे. ज्या भागात प्राण्यांचा अधिवास आहे, अशा ठिकाणी ही प्रथा टाळली पाहिजे. – आदित्य परांजपे, पर्यावरण अभ्यासक
दरवर्षी आम्ही गणेशोत्सव आणि दिवाळीच्या आधी, दरम्यान आणि नंतर वेगवेगळ्या भागात ध्वनी पातळीचा अभ्यास करतो. यावर्षी आत्ताच निर्धारित मर्यादेपेक्षा आवाजाची पातळी जास्त असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अद्याप उत्सवाचे प्रमुख दिवस बाकी आहेत. – महेश शिंदीकर, पर्यावरण विभाग प्रमुख, सीओईपी टेक्निकल युनिव्हर्सिटी